जळगाव : जळगावमध्ये (Jalgaon News) एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये म्हशींना पाणी पाजण्यासाठी जात असताना अचानक बोरी नदीला पूर आला आणि एक शेतकरी वाहून गेला. ही घटना पारोळा तालुक्यातील भिलाली गावाजवळ बोरी नदीच्या पुलावर शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता घडली. राज्य आपत्ती दलाच्या पथकाने रात्रभर शोध घेतला पण त्यांचा मृतदेह आढळून आला नाही. शेवटी दुसऱ्या दिवशी सकाळी आठ वाजता एका शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला.
काय घडले नेमके?
कमलाकर हिंमत पाटील (50) रा. भिलाली ता पारोळा असे पुरात बुडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. याबाबत पारोळा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अमळनेर तालुक्यातील बोले नदीला शुक्रवारी अचानक मोठा पूर आला. त्यामुळे तामसवाडी येथील बोरी नदीवरच्या धरणातून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू झाला.
यादरम्यान पिलाली गावातील रहिवासी कमलाकर पाटील हे त्यांच्या म्हशींना पाणी पाजण्यासाठी घेऊन जात असताना अचानक गावाजवळ बोरी नदीच्या पुलावरून मोठ्या प्रमाणावर पुराच्या पाण्याचा प्रवाह आला.यावेळी अचानक पाय घसरल्याने कमलाकर पाटील हे खाली पडले. त्यानंतर पुराच्या पाण्यात वाहून गेले. या घटनेची माहिती मिळताच परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना यश आले नाही. अखेर यासाठी राज्य आपत्ती दलाच्या पथकाला पाचारण करण्यात आले.
या पथकाने दुसऱ्या दिवशी सकाळी शोध मोहीम राबवली तेव्हा एका शेतात त्यांचा मृतदेह आढळून आला. मृत कमलाकर यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि मुलगी तसेच तीन भाऊ व त्यांचे कुटुंब असा परिवार आहे. ते दुध विक्रीचा व्यवसाय करत होते.त्यांच्या अश्या अचानक झालेल्या निधनामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.