अमरावती : अमरावतीमध्ये (Amravati News) एक धक्कादायक हत्याकांड घडले आहे. यामध्ये जावयाने सासू आणि मेव्हण्याला जिवंत पेटवून त्यांची हत्या केली आहे. यानंतर आरोपी जावयाने स्वतःलाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये खळबळ उडाली आहे. माहेरी गेलेल्या पत्नीला तिच्या घरचे परत पाठवत नसल्याने जावयाने हे धक्कादायक कृत्य केले आहे.
काय घडले नेमके?
ही धक्कादायक घटना वरुड तालुक्यातील वंडली या ठिकाणी घडली आहे. सासू आणि मेव्हण्याचा खून केल्यानंतर जावयाने स्वत:लाही पेटवून घेत आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे अमरावतीमध्ये एकच खळबळ उडाली आहे. रविवारी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी आशिष ठाकरे (वय 25 वर्षे) असे जावयाचे नाव आहे. तर सासू लता सुरेशराव भोंडे (वय 45 वर्ष) आणि मेव्हणा प्रणय सुरेशराव भोंडे (वय 20 वर्षे) अशी जळून खाक झालेल्यांची नावे आहेत.
आशिषचा लता भोंडे यांच्या मुलीशी काही महिन्यांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. त्यांच्यातील प्रेमसंबंध धोंडे कुटुंबीयांना मान्य नव्हते. मात्र कालांतराने या दोघांमध्ये वारंवार खटके उडू लागले. त्यांच्यामधील वाद विकोपाला गेला आणि मुलगी पुन्हा तिच्या आईकडे राहण्यासाठी आली. आशिष पत्नीला घ्यायला लता भोंडे यांच्या घरी गेला होता. मात्र लता भोंडे आणि त्यांच्या मुलाने मुलीला आशिषसोबत पाठवण्यास नकार दिला. त्यांच्यात जोरदार भांडण देखील झाले होते. त्यानंतर रविवारी पत्नी घरी नसताना आशिष सासूच्या घरी गेला. त्यानंतर त्याने सासू आणि मेव्हण्याला जिवंत जाळले. त्यानंतर त्याने स्वत:लाही संपवून घेतले.