नागपूर : नागपुरातील बहुचर्चित कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणी न्यायालयाने एक मोठा निर्णय दिला आहे. या प्रकरणातील तिन्ही दोषींना कोर्टाकडून दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. गणेश शाहू, अंकित शाहू आणि गुडिया शाहू अशी या प्रकरणातील आरोपींची नावे आहेत.
काय आहे प्रकरण?
नागपुरातल्या न्यूज पोर्टलचे पत्रकार रविकांत कांबळे यांच्या 55 वर्षीय आई उषा आणि दीड वर्षांची मुलगी राशी यांची हत्या करण्यात आली होती. 17 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळपासून आजी-नात बेपत्ता होत्या, त्यानंतर रविवारी (18 फेब्रुवारी 2018) त्यांचे मृतदेह नागपूर-उमरेड रस्त्याजवळ नाल्यात एका गोणीत गुंडाळलेले आढळून आले होते. बेपत्ता होण्यापूर्वी उषा कांबळे या राशीला घेऊन घराजवळच्या ज्वेलर्सकडे पायपट्टी घेण्यासाठी गेल्या होत्या. परत येताना शिव किराणा स्टोअर्सजवळ त्या काही वेळ थांबल्या होत्या. मात्र त्यानंतर रात्री उशिरापर्यंत घरीच न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांच्या बेपत्ता होण्याची हुडकेश्वर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली होती.
त्यानंतर 18 फेब्रुवारी 2018 रोजी सकाळी दोघींचे मृतदेह घरापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर एका नाल्यात आढळले होते. यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास केला असता पोलिसांना कांबळे कुटुंबियांच्या घरापासून 100 मीटर अंतरावर शिव किराणा स्टोअर्स अँन्ड डेली नीड्सच्या समोर उभ्या असलेली महिंद्रा xuv गाडी संशयास्पदरित्या धुतलेली आढळली. पोलिसांनी चौकशी केली असता कारमध्ये पोलिसांना काही रक्ताचे डाग मिळाले. यानंतर पोलिसांनी किराणा दुकानचा मालक गणेश शाहूला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली.
यानंतर त्याच्या घराची झडती घेण्यात आली. यावेळी गणेशच्या घराच्या वरच्या मजल्यावर अनेक ठिकाणी रक्ताचे डाग आढळले. इतकंच नाही, तर किचनमधील बेसिन आणि बाथरुमच्या नळाजवळही रक्ताचे डाग आढळले. छतावरच्या पंख्याच्या एका पात्यावरही रक्ताचे डाग आढळले. तसेच हि घटना घडली तेव्हा परिसरातील काही लोकांनी मृत आजी आणि नातीला शिव किराणा स्टोअर्सजवळ पाहिलं होतं. यानंतर पोलिसांनी आपला हिसका दाखवल्यानंतर गणेशने आपला गुन्हा मान्य केला. आर्थिक वादातून आपण या दोघींची हत्या केल्याचे त्याने मान्य केले.