नवी दिल्ली : वृत्तसंस्था – 2008 मध्ये टीव्ही पत्रकार सौम्या विश्वनाथनची हत्या (Soumya Viswanathan Murder Case) करण्यात आली होती. या प्रकरणी आता साकेत कोर्टाने पाचही आरोपींना दोषी ठरवले आहे. रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना या हत्येप्रकरणी दोषी ठरवलं आहे. या प्रकरणी आता पुढची सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी पार पडणार आहे. या दिवशी पाचही आरोपींना शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे. सगळ्या आरोपींना मोक्का अंतर्गत हत्या आणि लूट गुन्हे नोंदवत दोषी ठरवण्यात आलं आहे.
15 वर्षांपूर्वी पत्रकार सौम्या विश्वनाथनची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सौम्या विश्वनाथनची 30 सप्टेंबर 2008 च्या दिवशी पहाटे 3.30 ला हत्या करण्यात आली. ती आपल्या कारने घरी परतत होती. त्याचवेळी तिच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या आणि तिला ठार करण्यात आलं.पोलिसांनी हा दावा केला की तिची हत्या लुटीच्या उद्देशाने झाली होती. या हत्या प्रकरणात रवि कपूर, अमित शुक्ला, बलजीत मलिक, अजय कुमार आणि अजय सेठी यांना अटक करण्यात आली. 2009 पासून हे सगळे आरोपी तुरुंगात आहेत. पोलिसांनी सगळ्या आरोपींवर मोक्का लावला आहे.
जेव्हा पोलीस जिगिशा घोषच्या हत्या प्रकरणी तपास करत होते तेव्हा पोलिसांना सौम्या विश्वनाथन प्रकरणातला महत्त्वाचा पुरावा मिळाला. चौकशी दरम्यान पोलिसांना हे समजलं की वसंत विहार या ठिकाणी जे हत्याकांड झालं त्या या हत्येचे धागेदोरे मिळते जुळते आहेत. पोलिसांनी 2009 मध्ये 620 पानांचं चार्जशीट दाखल केलं. वरिष्ठ पोलीस अधिकारी एचजीएस धालीवाल यांनी सांगितलं की पाचही आरोपींवर हत्या, पुरावे नष्ट करणं, कट रचणं हे गुन्हे दाखल आहेत.