अहमदनगर : अहमदनगरमध्ये (Ahmednagar News) एक धक्कादायक हत्याकांड उघडकीस आले आहे. यामध्ये एकाच कुटुंबातील तीन जणांची हत्या करण्यात आली आहे. शिर्डीच्या सावळीविहीर गावात ही धक्कादायक घटना घडली आहे.जावयाने धारधार शस्त्राने पत्नी, मेव्हणा आणि आजे सासूची हत्या केली आहे. तसेच या हल्ल्यात मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. कौटुंबिक वादातून हत्याकांड झाल्याचे समजत आहे. या हत्याकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
सुरेश निकम असे आरोपी जावयाचे नाव आहे. त्याचा आपल्या पत्नीसोबत आणि तिच्या माहेरच्या मंडळीशी अनेक वर्षांपासून वाद सुरु होता. पत्नी माहेरी राहत असल्याने पती-पत्नीमध्ये वाद असल्याचे समोर आले आहे. दरम्यान काल मध्यरात्रीच्या सुमारास हे हत्याकांड घडले आहे. रागाच्या भरात आरोपी सुरेश निकमने घरात घुसून पत्नी, सासू, सासरे, आजेसासू, मेहुणा आणि मेहुणी यांच्यावर धारधार शास्त्राने वार केले. यामध्ये पत्नी, मेहुणा, आजेसासू जागीच ठार झाले तर सासू, सासरे आणि मेहुणी गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी शिर्डीच्या साईबाबा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
वर्षा सुरेश निकम ( वय 24 वर्षे), मेहुणा रोहित चांगदेव गायकवाड ( 25 वर्षे) आजे सासू हिराबाई द्रौपद गायकवाड ( 70 वर्षे) अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करून आरोपी जावई सुरेश निकम याला नाशिक जिल्ह्यातून अटक केली आहे. आरोपी विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात हत्येसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिर्डी पोलिसांकडून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.