अहमदनगर : अहमदनगरमधून (Ahmednagar Crime) बाप – लेकाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. यामध्ये पती-पत्नीच्या वादामुळे दोन चिमुरड्याना आपला जीव (Ahmednagar Crime) गमवावा लागला आहे. पती-पत्नीच्या भांडणात क्रूर पित्याने आपल्या दोन लहान मुलांना विहिरीत फेकून दिले आहे. गोकुळ क्षीरसागर (वय 38 वर्षे, रा. आळसुंदे, कर्जत) असे आरोपी नराधम बापाचे नाव आहे तर ऋतुजा (वय 8 वर्षे) आणि वेदांत (वय 4 वर्षे) अशी मृत चिमुकल्यांची नावं आहेत.
दोघांचा पाण्यात बुडून मृत्यू
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यामध्ये आळसुंदे गावात रविवारी (6 ऑगस्ट) ही घटना घडली. गोकुळ क्षीरसागर याचे आपल्या पत्नीसोबत भांडण झाले. यानंतर त्याने रागाच्या भरात आपली 8 वर्षांची मुलगी ऋतुजा आणि चार वर्षांचा वेदांत या आपल्या दोन मुलांना जवळच असलेल्या विहिरीत फेकले. या दोघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे कर्जत तालुक्यासह परिसरात खळबळ उडाली आहे.
आरोपी गोकुळ शिरसागरने पत्नीसोबत भांडण झाल्यानंतर घरापासून 600 मीटर अंतरावर असलेल्या विहिरीत आपल्या दोन्ही मुलांना फेकलं. काही वेळातच दोन्ही मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला.याची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही मुलांना विहिरीतून बाहेर काढले व तातडीने कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले मात्र त्या ठिकाणी डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.