नाशिक : राज्यात सध्या अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. अशीच अपघाताची घटना नाशिकमध्ये (Nashik) घडली आहे. यामध्ये मोटारसायकलची धडक बसून झालेल्या अपघातात (Accident) तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. भगूर विजयनगर पांडुर्ली मार्गावरील रेल्वे गेट उड्डाणपुलावर मध्यरात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली आहे. या अपघातानंतर तरुण पुलावरून तब्बल 30 फूट खाली कोसळला होता. वैभव रंगनाथ गाडेकर (वय 26 , संसरी गाव) (Vaibhav Ranganath Gadekar) असे अपघातात मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
वैभव गाडेकर हा मंगळवारी मध्यरात्री 1 वाजेच्या सुमारास संसरी गावातून भगूरकडे उड्डाणपुलावरून येत होता. मात्र त्या ठिकाणी अंधार असल्यामुळे त्याला पुलाचा अंदाज न आल्याने त्याची दुचाकी उड्डाणपुलाला धडकून 30 फूट खाली कोसळली. या दुर्घटनेत वैभवला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच देवळाली कॅम्प पोलिसांनी (Deolali Camp Police) घटनास्थळी धाव घेतली आहे. यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा केला. मृत वैभव हा अविवाहित असून त्याच्या माघारी आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेमुळे गाडेकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.