पनवेल : मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर (Mumbai Pune Express Highway) एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. यामध्ये कोल्हापूर (Kolhapur) येथून देवदर्शन करून आपल्या घरी परतत असताना एका कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. गाडी अती वेगात असल्यामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कारने एका अज्ञात वाहनाला धडक दिली. या अपघातात कारमध्ये असलेल्या एकाचा जागीच मृत्यू झाला तर बाकी 3 जण गंभीर जखमी झाले आहेत.
काय घडले नेमके?
भिवंडी, मानकोली येथे राहणारे साहू कुटुंबीय कोल्हापूर येथून देवदर्शन करून आपल्या किआ कारने (एमएच 04 एलएच 9479) ने घरी परतत होते. यादरम्यान मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर आज पहाटे पावणेपाचच्या सुमारास खालापूर पोलीस ठाण्याच्या (Khalapur Police Station) हद्दीत कारचालक अभिषेककुमार मुन्नीलाल साहू (वय 37) याला वेगात असलेली कार कंट्रोल न झाल्याने त्याने पुढे चालणाऱ्या अज्ञात वाहनाला डाव्या बाजूने जोरात धडक दिली.
ही धडक एवढी भीषण होती कि, कारमध्ये असलेले मुन्नीलाल साहू (वय 68) यांच्या डोक्याला गंभीर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर कारचालक अभिषेक मुन्नीलाल साहू (वय.37) यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच शांतीदेवी मुन्नीलाल साहू (वय 60 वर्षे) यांचा डावा पाय फ्रॅक्चर होवून त्या गंभीर जखमी झाल्या. लक्ष्मीकुमारी अभिषेककुमार साहू (वय 33) यांच्या चेहऱ्याला दुखापत झाली आहे. सुदैवाने या अपघातात कुमारी त्रिशा अभिषेक साहू (वय 5) व कुमार दर्शील अभिषेक साहू (वय 1) या दोन चिमुकल्यांना कोणतीही दुखापत झाली नाही. या अपघाताची माहिती वाहतूक शाखा पळस्पे मोबाईल पथक व आयआरबी पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना रुग्णवाहिकेने एमजीएम हॉस्पिटल (MGM Hospital0 येथे दाखल केले.