महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी महत्वाची अपडेट आली असून या प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली आहे. मात्र या हल्ल्यामागे कोणत्याही वरिष्ठ राजकीय नेत्याचा समावेश नसल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.
तीन मार्च रोजी सकाळी संदीप देशपांडे शिवाजी पार्क येथे सकाळी मॉर्निंग वॉकला गेले होते. त्यावेळी चेहऱ्यावर मास्क लावून काही अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर लोखंडी रॉड आणि स्टम्पने जीवघेणा हल्ला केला. त्यांना हिंदूजा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. देशपांडे यांच्यावरील हल्ल्यानंतर राजकीय वातावरण चांगलंच ढवळून निघालं होतं.
या प्रकरणात मनसे नेते अमेय खोपकरांनी ठाकरे गटाचे नेते , माजी मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत यांचे नाव घेतल्याने वातावरण तापले होते. राजकीय वैमन्यस्यातून अज्ञात हल्लेखोरांनी हल्ला केल्याचा पोलिसांना संशय होता.
या प्रकरणी मुंबईच्या भांडूपमधून आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. आरोपींपैकी अशोक खरात हाच या हल्ल्याचा सूत्रधार असल्याची महती समोर आली असून हल्ल्यानंतर प्रसिद्धी मिळून येणाऱ्या पालिका निवडणुकीत उमेदवारी मिळेल, या आशेने कट रचल्याची माहिती पोलीस सूत्रांची दिली.