अकोला : अकोला (Akola) जिह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये हंडाभर पाणी भरण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विजेचा धक्का (Electric Shock) लागून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शिवम भरतसिंग ठाकुर (वय 26) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
अकोला जिल्ह्यात केळीवेळी नावाचे गाव आहे. या गावात आदर्श ग्राम मंडळ (Adarsh Gram Mandal) असून या ठिकाणी ग्राम मंडळावर किशोर बुले (Kishore Buley) यांची सत्ता आहे. बुले हे सध्या ग्राम मंडळाचे अध्यक्ष आहेत. दरम्यान, केळीवेळी गावाला तेल्हारा तालुक्यातील वान प्रकल्पातून पाण्याचा पुरवठा होतो. ग्राम मंडळाच्या काही तांत्रिक अडचणींमूळे गेल्या काही दिवसांपासून गावात जलपुरवठा होत नव्हता. त्यामुळे गावकऱ्यांची पाण्यासाठी भटकंती होत होती.
यामुळे मृत शिवम भरतसिंग ठाकुर (Shivam Bharat Singh Thakur) हा देखील हंडाभर पाण्यासाठी पांढरीमध्ये गेला होता. इथे साठवणुक ठिकाणी पाणी खोलवर असल्यामुळे शिवमने सोबत आणलेली पाण्याची मोटर सुरू केली आणि पाईप पाण्याच्या टाकीत सोडला. मात्र पाण्याच्या मोटरमध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि शॉर्टसर्किट होऊन शिवम ज्या ठिकाणी उभा होता, तिथे जोरदार विजेचा धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेसंदर्भात दहीहंडा पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या घटनेमुळे ठाकूर कुटुंबावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे.