भंडारा : भंडारा (Bhandara News) जिल्ह्यातून एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका 14 महिन्यांच्या बाळाचा टाकीत बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी 9 वाजताच्या सुमारास ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील राजापूर या ठिकाणी ही मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे.अद्विक अतुल शहारे असे मृत बालकाचे नाव आहे. अद्विक हा आई-वडिलांना एकुलता एक होता.या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काय घडले नेमके?
तुमसर तालुक्यातील राजापूर येथील अतुल शहारे यांच्या परिवारातील लोक काही कामा निमित्त बाहेर गेले असता अतुल हा आपल्या 14 वर्षीय बाळ अद्विकसोबत घरी एकटाच होता. घरात कुणीही नसल्याने तो अद्विकला सोबत घेऊन शेजारीच राहत असलेल्या नातेवाइकांकडे गेला. दरम्यान, अतुलला शौच लागल्याने तो अद्विकला नातेवाइकाकडे ठेवून शेजारील शेतात शौचास गेला. काही वेळानंतर परतल्यावर अतुलला अद्विक त्यांच्या घरी दिसला नाही, त्याने नातेवाईकांना अद्विकबाबत विचारणा केली. अद्विक हा नेहमी नातेवाईकांच्या घरून आपल्या घराकडे एकटाच जात असे, त्यामुळे नेहमी प्रमाणे अद्विक घराकडे जाताना दिसल्याचं नातेवाइकांनी सांगितले.
यानंतर अतुल यांनी अद्विकचा सगळीकडे शोध घेण्यास सुरुवात केली. मात्र, तो कुठेच दिसला नाही. अशात तो आस पास खेळत असावा असे अतुलला वाटले. मात्र तो पाण्याच्या टाकीत पडला असावा अशी पुसटशीही कल्पना कोणी केली नसेल. दरम्यान, काही वेळाने अतुल हा पाण्याच्या टाकीतून पाणी घेण्याकरिता गेला असता अद्विक पाण्याच्या टाकीत पडला असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्याला तात्काळ उपचाराकरिता नाकाडोंगरी येथील डॉक्टरकडे नेण्यात आले. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या ठिकाणी त्याला मृत घोषित केले. यानंतर 14 महिन्याच्या अद्विकचं पार्थिव बघून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. अद्विकच्या जाण्याने उपस्थित सगळ्यांच्या डोळ्यांत पाणी आले. गोबरवाही पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली असून पोलिस निरीक्षक नितीन मदनकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोबरवाही पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.