विद्यमान पालकमंत्र्यांनी आघाडी सरकारच्या काळात कोल्हापूरकरांसाठी थेट पाइपलाईनची व्यवस्था केली नाही, तर इथून पुढे निवडणूक लढणार नाही, अशी घोषणा केली होती. पण अद्याप कोल्हापूरकरांना दाखवलेले हे स्वप्न पालकमंत्र्यांना पूर्ण करता आले नाही, त्यामुळे त्या घोषणेचं काय झालं, असा सवाल भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंत्री सतेज पाटील यांना विचारला.
कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपा उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ शिवाजी पेठेतील पद्माराजे उद्यान येथे शहर भाजपाच्या वतीने मिसळ पे चर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
यावेळी माजी खासदार धनंजय महाडिक, सत्यजित कदम, महेश जाधव, प्रा. जयंत पाटील , अजिंक्य चव्हाण, बाजीराव चव्हाण, अजित ठाणेकर, अशोक देसाई, विजयसिंह खाडे पाटील, सुदर्शन सावंत, मुरलीधर जाधव, अजित हारुगले, भारती जोशी, कविता पाटील यांच्या सह इतर मान्यवर आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.
पाटील म्हणाले की, आघाडी सरकारच्या काळात विद्यमान पालकमंत्री राणाभीमदेवी थाटात म्हणत होते की, कोल्हापूरकरांचे थेट पाइपलाइनचे स्वप्न पूर्ण केले नाही, तर भविष्यात निवडणूक लढणार नाही. पण कोल्हापुरकरांचे हे स्वप्न अजूनही पूर्ण झाले नाही. त्यामुळे त्या घोषणेचं काय झालं? असा सवाल त्यांनी यावेळी विचारला.
ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षात सर्वाधिक महिला लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळे छत्रपती ताराराणींच्या कोल्हापूर शहरातून कॉंग्रेसला ५० वर्षांच्या काळात महिला लोकप्रतिनिधी का देता आले नाही. असा प्रश्न विचारुन पाच वर्षांत माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात कोल्हापुरात झालेल्या विकासकामांचा पाढाच यावेळी पाटील यांनी जनतेसमोर मांडला.