पुण्यात अतिशय भीषण अपघात झाला आहे. कल्याण-नगर महामार्गावरील गुळुंचवाडी या ठिकाणी हा अपघात घडला. अंत्यविधी करून घरी परतणाऱ्या अनेक नागरिकांना भरधाव वेगात आलेल्या ट्रकने चिरडले. ज्या 5 जणांचा मृत्यू तर 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या आधिक माहितीनुसार, आज सकाळी सव्वा अकरा वाजण्याच्या सुमारास जुन्नर तालुक्यातील मौजे गुळुंचवाडी या ठिकाणी हा भीषण अपघात झाला. गावात राहणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने अनेक गावकरी अंत्यविधी आटपून घरी परतत होते. त्याचवेळी कल्याण नगर रोडने जाणाऱ्या ट्रकने तीन दुचाकी चालकांसह, एक चारचाकी आणि पंधरा ते वीस पादचाऱ्यांना चिरडले. यात लहान मुलांसह एक महिला व एका पुरुषाचा जागीच मृत्यू झाला. तर दहा ते बारा जण गंभीर जखमी झाले आहेत.
ही घटना आळेफाटा पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली. तात्काळ जखमींना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. मात्र या अपघातामुळे गावकऱ्यां मध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले. गावातील नागरिकांनी घटनेचा निषेध व्यक्त करत अपघाताच्या घटनास्थळी रास्ता रोको आंदोलन केले. काही वेळ महामार्गावरील वाहतूक अडवून ठेवली होती. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांची समजूत घातली. तर या ठिकाणी बायपास रोड करावा ही मागणी अनेकदा नागरिकांनी केली होती. मात्र त्याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे हा गंभीर अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून केला जात आहे.