Breaking News ! राणा दांपत्य अजून दोन दिवस कोठडीतच, जामिनावर बुधवारी निर्णय

491 0

मुंबई- राजद्रोहाच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या राणा दाम्पत्याला मुंबई सत्र न्यायालयाने दणका दिला आहे. नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीन अर्जावर निकाल देताना राणा दाम्पत्याच्या कोठडीत बुधवारपर्यंत (4 मे पर्यंत) वाढ केली आहे. 

शनिवारी या प्रकरणावर दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयानं आपला निकाल राखून ठेवला होता. जामीन याचिकेला उत्तर देताना राज्य सरकारनं राणा दाम्पत्याच्या जामीनाला जोरदार विरोध केला आहे. राजद्रोहासारखा गंभीर गुन्हा दाखल असल्यानं आणि त्यांच्याविरोधात यापूर्वीही विविध पोलीस स्थानकांत इनेक गुन्हे दाखल असल्यानं त्यांना जामीन देण्यात येऊ नये, तसेच जामीनावर बाहेर आल्यानंतरही तेढ निर्माण करणारी किंवा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणारी वक्तव्य त्यांच्याकडून केली जाऊ शकतात, असं म्हटलं आहे.

नवनीत राणा यांच्याविरोधात खोटं जात प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर आमदार रवी राणा यांच्याविरोधात 17 गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या दाम्पत्याला जामीन देऊ नये, असा युक्तिवाद सरकारच्या वतीने करण्यात आला.

नेमकं प्रकरण काय?

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याची घोषणा केली होती. नवनीत राणा यांच्या घोषणेनंतर राज्यभरातून शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं होतं. राणा दाम्पत्य मातोश्रीबाहेर हनुमान चालिसा पठण करण्यासाठी मुंबईत दाखल झालं, तर दुसरीकडे शिवसैनिकांनी राणा दाम्पत्याविरोधात मातोश्रीबाहेर ठिय्या दिला. राणांच्या घोषणेनंतर शिवसेना समर्थक चांगलेच संतप्त झाले आणि त्यांनी राणा यांच्या खार येथील घराबाहेर जोरदार निदर्शनं केली. तसेच, दोन दिवस शिवसैनिकांनी मातोश्रीबाहेरही राणा दाम्पत्यांविरोधात ठिय्या दिला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!