बीड मधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Deshmukh) हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला असताना बीड (Beed) मधील आणखी एका सरपंचाचा मृत्यू झाल्याची घटना. बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई (Ambejogai) तालुक्यातून ही धक्कादायक बातमी समोर आली असून या तालुक्यातील सौंदाना (Saudana village) गावातील सरपंचाचा मृत्यू झाला आहे.
अभिमन्यू क्षीरसागर असं मृत्यू झालेल्या सरपंचाचं नाव आहे. ते सौंदाना गावचे सरपंच होते. मिळालेल्या माहितीनुसार अभिमन्यू क्षीरसागर हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्यावेळी मागून आलेल्या राखेची वाहतूक करणाऱ्या टिप्परने त्यांना जोरदार धडक दिली. या धडकेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अभिमन्यू क्षीरसागर यांना टिप्परची लागलेली धडक हा अपघात होता ही जाणून-बुजून देण्यात आलेली धडक होती, असा प्रश्न उपस्थित होत आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी देखील करण्यात येत आहे. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरण ताज असताना आता महिनाभरात दुसऱ्या एका सरपंचाचा मृत्यू झाल्याने बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.