ओबीसी आरक्षणाशिवाय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.काही पक्षांमध्ये कोर्टाच्या आदेशानंतर संभ्रमाचं वातावरण आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयाने महाविकास आघाडी सरकारला दोन आठवड्यात निवडणुकांच्या तारखा जाहीर करा असे आदेश दिले आहेत. “कोर्टानं असं सांगितलं आहे की, निवडणूक ज्या टप्प्यात थांबवली होती, तिथून सुरु करा. काही ठिकाणी याद्या तयार नाही. काही ठिकाणी हरकती मागवायच्या आहेत. हरकती मागितल्यावर एक महिना जातो. त्यानंतर वॉर्डरचना होते. त्याला एक महिन्याचा कालावधी जातो. त्यानंतर महिला, मागासवर्गीयांसाठी राखीव वॉर्ड रचनेसाठी एक महिना जातो.निवडणुका घेण्यासाठी अडीच ते तीन महिने लागणारच. त्यामुळे १५ दिवसात निवडणुका जाहीर करणं शक्य नाही असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं आहे. पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी किमान अडीच ते तीन महिन्यांचा अवधी लागेल, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.