2009 पासून महाराष्ट्र विधानसभा निवडणूक (Assembly Election) लढवत असलेल्या ‘एमआयएम’ (AIMIM) पक्षाची ‘कटी पतंग’ मालिका अद्याप सुरूच आहे. 2024 च्या निवडणुकीत एक ‘पतंग’ उडाला, तर 16 कटले! 17 उमेदवारांपैकी एक जण आमदार बनला, तर एका विद्यमान आमदारासह 16 उमेदवारांना हार पत्करावी लागली.
मालेगाव मध्यवर पुन्हा एकदा ‘एमआयएम’चा कब्जा!
2024 च्या विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’ पक्षाकडून 17 उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवण्यात आले होते. त्यातील मालेगाव मध्य (Malegaon Central) मतदारसंघ पुन्हा एकदा आपल्याकडं राखण्यात पक्षाला यश आलं. या मतदारसंघात ‘एमआयएम’, काँग्रेस (Congress) आणि इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली ऑफ महाराष्ट्र (ISLAM) या तीन प्रमुख पक्षांचे उमेदवार उभे होते. ‘एमआयएम’ च्या मुफ्ती इस्माइल (Mufti Ismail) यांनी 1 लाख 09 हजार 653 इतकी मतं घेत विजय मिळवला. इंडियन सेक्युलर लार्जेस्ट असेम्बली ऑफ महाराष्ट्र पक्षाचे उमेदवार आसिफ रशीद यांचा अवघ्या 162 मतांनी पराभव झाला. त्यांना 1 लाख 09 हजार 491 इतकी मतं पडली. काँग्रेसचे उमेदवार इजाज बेग हे 7527 इतकी मतं मिळवून चौथ्या स्थानी राहिले. ‘वंचित’नं इथं उमेदवार दिला नाही तर शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा अर्ज छाननी प्रक्रियेत बाद झाला. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत मुफ्ती इस्माइल यांच्या रूपानं ‘एमआयएम’नं मिळवलेला हा एकमेव विजय ठरला. 2019 च्या निवडणुकीत याच मतदारसंघातून मोहम्मद खालिक यांनी 1 लाख 17 हजार 242 इतकी मतं घेऊन विजय मिळवला होता. त्यांनी काँग्रेसच्या आसिफ शेख यांचा पराभव केला होता. यावेळी मोहम्मद खालिक यांच्याऐवजी मुफ्ती इस्माइल यांना उमेदवारी देण्यात आली.
विद्यमान आमदार फारूख शाह, 02 माजी आमदार पराभूत
2019 च्या निवडणुकीत ‘एमआयएम’नं उभ्या केलेल्या 44 उमेदवारांपैकी 02 जण आमदार बनले होते. धुळे शहर (Dhule City) मतदारसंघातून फारूख शाह, तर मालेगाव मध्य मतदारसंघातून मोहम्मद खालिक यांनी विजय मिळवला होता. 2024 च्या निवडणुकीत धुळे शहरमधून विद्यमान आमदार फारूख शाह यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली मात्र ते पराभूत झाले. भाजपचे अनुपभय्या अगरवाल यांनी 1 लाख 16 हजार 538 इतकी मतं घेऊन विजय मिळवला तर फारूख शाह 70, 788 मतं मिळवून ‘रनर अप’ ठरले. ते पराभूत झाले खरे पण त्यांच्या उमेदवारीचा फटका माजी आमदार आणि यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून उभे राहिलेले उमेदवार अनिल गोटे यांना बसला. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या
गोटे यांना अवघी 24, 304 इतकी मतं मिळाली. 2014 च्या निवडणुकीत ‘एमआयएम’नं उभ्या केलेल्या 24 उमेदवारांपैकी 02 जण आमदार बनले होते. औरंगाबाद (छ. संभाजीनगर) मध्यमधून इम्तियाज जलील, तर भायखळ्यातून वारिस पठाण विजयी झाले होते. 2024 च्या निवडणुकीत जलील यांना औरंगाबाद (छ. संभाजीनगर) पूर्वमधून, तर पठाण यांना भिवंडी पश्चिममधून उमेदवारी देण्यात आली. मात्र, दोघेही पराभूत झाले. इम्तियाज जलील 91,113 इतकी मतं मिळवून ‘रनर अप’ ठरले. अवघ्या 2161 मतांनी त्यांचा पराभव झाला. जलील यांनी 2019 मध्ये औरंगाबाद मध्यमधून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेचे प्रदीप जैस्वाल यांचा पराभव केला होता. भिवंडी पश्चिममधून लढलेले वारिस पठाण पाचव्या क्रमांकावर फेकले गेले. त्यांना 15800 इतकी मतं मिळाली. पठाण यांनी 2019 मध्ये भायखळ्यातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी त्यांनी भाजपचे मधू चव्हाण यांचा पराभव केला होता.
‘एमआयएम’च्या 05 उमेदवारांमुळं युती-आघाडीला फटका!
इम्तियाज जलील (औरंगाबाद पूर्व), नसीरूद्दीन सिद्दिकी (औरंगाबाद मध्य), फारूख शाह (धुळे शहर), फारूख शाब्दी (सोलापूर शहर मध्य) आणि आतिक खान (मानखुर्द शिवाजीनगर) हे 05 उमेदवार ‘रनर अप’ (दुसऱ्या स्थानी) ठरले. मात्र, या 05 जणांच्या उमेदवारीमुळं काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रत्येकी 02, तर शिवसेनेच्या एका उमेदवाराला फटका बसला. औरंगाबाद पूर्व मतदारसंघातून उभे राहिलेले इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांचा अवघ्या 2161 मतांनी पराभव झाला असला तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेसचे उमेदवार लहू शेवाळे यांना बसला. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या शेवाळे यांना 80,706 इतकी मतं मिळाली. औरंगाबाद मध्य मतदारसंघातून उभे राहिलेले नसीरूद्दीन सिद्दिकी यांचा 8119 मतांनी पराभव झाला असला तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार बाळासाहेब थोरात यांना बसला. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या थोरात यांना 37,098 इतकी मतं मिळाली. धुळे शहर मतदारसंघातून उभे राहिलेले विद्यमान आमदार फारुख शाह यांचा 45,750 मतांनी पराभव झाला असला तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटे यांना बसला. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या गोटे यांना 24,304 इतकी मतं मिळाली. सोलापूर शहर मध्य मतदारसंघातून उभे राहिलेले फारुख शाब्दी यांचा 48,850 मतांनी पराभव झाला असला तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका काँग्रेसचे उमेदवार चेतन नरोटे यांना बसला. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या नरोटे यांना 16,385 इतकी मतं मिळाली. मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उभे राहिलेले आतिक खान यांचा 12,753 मतांनी पराभव झाला असला तरी त्यांच्या उमेदवारीचा फटका शिवसेचे उमेदवार सुरेश ऊर्फ ‘बुलेट’ पाटील यांना बसला. तिसऱ्या स्थानी राहिलेल्या पाटील यांना 35,263 इतकी मतं मिळाली.
‘एमआयएम’ Vs ‘वंचित’ :13 पैकी 10 जागी ‘एमआयएम’ वरचढ!
2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘एमआयएम-वंचित’ अशी आघाडी झाली होती. औरंगाबाद लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढलेल्या इम्तियाज जलील यांना या आघाडीचा फायदा झाला होता. त्यांनी शिवसेनेचे खासदार चंद्रकांत खैरे यांचा पराभव करून विजय मिळवला होता. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी तुटली आणि दोन्ही पक्ष पूर्वीप्रमाणे स्वबळावर लढू लागले. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ‘वंचित’नं 200 जागा लढवल्या तर ‘एमआयएम’नं 17 जागा लढवल्या. हे दोन्ही पक्ष 13 जागांवर आमनेसामने आले. त्यातील 10 जागांवर ‘एमआयएम’, तर 03 जागांवर ‘वंचित’ वरचढ ठरली. ‘एमआयएम-वंचित’ यांच्यात आमनासामना झालेल्या 10 पैकी 05 जागी ‘एमआयएम’ ‘रनर अप’ ठरला तर 03 जागी तिसरं स्थान मिळवून ‘वंचित’ ही ‘एमआयएम’च्या वरचढ ठरली.
एकूणच काय तर स्वतंत्र लढल्यानं ‘एमआयएम’मुळं ‘वंचित’ला बहुतांश ठिकाणी फटका बसला. 200 जागा लढून एकही जागा जिंकता न आलेल्या ‘वंचित’च्या तुलनेत अवघ्या 17 जागा लढून ‘एमआयएम’नं एक उमेदवार जिंकून आणला. 2009 पासून 2024 पर्यंतच्या चार विधानसभा निवडणुकीत ‘एमआयएम’चे 05 उमेदवार आमदार बनले, ही देखील या पक्षासाठी समाधानाची बाब म्हणता येईल. मात्र, महाराष्ट्राच्या वादळी राजकारणात ‘एमआयएम’चा ‘पतंग’ कटणार नाही याची काळजी घेताना पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांच्या हातातला पक्ष संघटनेचा मांजा देखील तितकाच मजबूत असायला हवा नाहीतर ‘कटी पतंग’ व्हायला वेळ लागणार नाही!
विशेष संपादकीय! घराणेशाहीला निवडून देणाऱ्या लोकशाहीचा ‘विजय’ असो!