लोकसभेला अपेक्षित यश न मिळालेल्या महायुतीला विधानसभेत भरघोस मताधिक्य मिळालं. त्यामुळेच महायुतीने ईव्हीएम (EVM) मशीन मध्ये फेरफार केल्याचे आरोप केले जात आहेत. विरोधी लाट असतानाही अचानक महायुतीला इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान होणं शक्य नाही असं महाविकास आघाडीचे नेते म्हणत आहेत. याच अनुषंगाने ईव्हीएम मशीन मधील एक घोटाळा उघडकीस आणण्याचा इशारा शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी दिला आहे. त्याचबरोबर धक्कादायक आकडेवारी देखील जाहीर केली आहे.
ईव्हीएम विरोधात आव्हाडांची टीम
जितेंद्र आव्हाड हे चांगल्या मताधिक्याने निवडून आले. त्यामागे ईव्हीएम मध्ये फेरफार होऊ नये, यासाठी त्यांनी त्यांची टीम कामाला लावली होती. त्यामुळे त्यांना याचा फटका बसला नाही. मात्र इतर अनेक नेत्यांना याचा फटका बसला. त्याबाबतचीच आकडेवारी त्यांनी समोर आणली आहे. आव्हाड यांनी कन्नड विधानसभा मतदारसंघातील एका मतदान केंद्रावरील मतमोजणीची आकडेवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातील तळनेर नावाच्या एका छोट्याशा गावात 396 एकूण मतदार आहेत. त्यापैकी गावातील 312 जणांनी मतदान केलं. मात्र तेथील उमेदवारांना पडलेली मतं दुप्पट असल्याचं आढळून आलं आहे.
आव्हाड यांची पोस्ट
आव्हाड यांनी याविषयी एक्स या प्लॅटफॉर्मवर पोस्ट लिहिली आहे. पोस्टमध्ये ते म्हणतात, ‘मतदान झाले 312, मतमोजणीत निघाले 624… 312 जणांनी मतदान केले असताना शिवसेना (UBT) – 194, शिवसेना (शिंदे) – 326, अपक्ष (हर्षवर्धन जाधव) – 104 असे मतदान झाले आहे. या तीनही उमेदवारांच्या मतदानाची बेरीज 624 इतकी होते. EVM वर मुळीच शंका नाही पण या प्रश्नाचे उत्तर कोण देणार? लवकरच हे उघडकीस आणू!’ याबरोबरच त्यांनी विविध बातम्यांचा देखील आढावा घेतला असून महाराष्ट्रात 5 लाख 4 हजार 313 अधिकचं मतदान दाखवण्यात आलं आहे, त्यावर निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण देण्याची मागणी त्यांनी केली आहे.