अहमदनगरच्या राजकारणातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. भाजपने माजी खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी नाकारण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळेच सुजय विखे पाटील हे आता पक्षांतर करण्याचा किंवा अपक्ष लढण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत अधिकृत माहिती नसली तरीही दबक्या आवाजात या चर्चा सुरू झाल्या आहेत.
अहमदनगरमध्ये विखे पाटील कुटुंबाचं सुरुवातीपासूनच वर्चस्व राहीलं आहे. सुजय विखे यांनी संगमनेर मतदारसंघातून निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे. मात्र एकाच घरत दोन उमेदवार नको, अशा विचारात भाजप असल्यानं सुजय विखे यांना भाजपने उमेदवारी नाकारण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळेच सुजय विखे पाटील हे वेगळा विचार करू शकतात. दरम्यान, महायुतीमध्ये संगमनेरची जागा ही शिवसेनेकडे आहे. त्यामुळे या जागेवर विखें ऐवजी कोणता उमेदवार असणार याबाबत चर्चा सुरू झाली आहे.
सुजय विखे जरांगेंकडून लढणार ?
एकीकडे सुजय विखेंना उमेदवारी नाकारण्यात आल्याची सूत्रांची माहिती असतानाच दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांनी मनोज जरांगे पाटलांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. राधाकृष्ण विखे पाटील आणि जरांगे पाटील यांच्यात अनेक वेळ बंद दाराआड चर्चा देखील झाली. या चर्चेत नेमकं काय झालं याबाबत माहिती हाती आलेली नाही मात्र चर्चेत काय झालं असेल याची उत्सुकता मतदारांना आहे. त्यातच पक्षाने तिकीट नाकारल्यास सुजय विखे हे मनोज जरांगे यांच्याकडून निवडणूक लढवू शकतात, अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र सुजय विखे हे भाजप सोडून मनोज जरांगे यांची वाट धरणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.
सुजय विखे अपक्ष लढणार?
2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुजय विखे पाटलांनी काँग्रेसकडून उमेदवारी मागितली होती. मात्र तेव्हा काँग्रेसने उमेदवारी न दिल्याने त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे आताही उमेदवारी नाकारल्यास विखे पाटील पुन्हा पक्ष बदलू शकतात. किंवा काँग्रेसच्या बाळासाहेब थोरात यांना तगडी फाईट देण्यासाठी ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवू शकतात. अशा चर्चांना उधाण आलं आहे. त्यामुळे आता सुजय विखे पाटील हे नेमका कोणता निर्णय घेणार, याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं आहे.