एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा आणि एकच मळकट सदरा व एकच काळपट धोतर नेसून काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात पडेल ते काम करून कार्यालयाबाहेर टाकलेल्या बाकड्यावर थकून झोपी जाणारा माणूस पुढं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला होता हे सांगितलं तर आपला विश्वास बसेल? पण, हे खरं आहे. 1962 च्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्राचे दुसरे मुख्यमंत्री बनलेले साधे सरळ व्यक्तित्व म्हणजेच मारोतराव कन्नमवार. कोण होते हे मारोतराव कन्नमवार आणि 1962 च्या निवडणुकीत काय घडलं? आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाहूयात… विशेष मालिका विधानसभा फास्ट फॉरवर्ड! पहिला भाग… किस्सा 62 चा!
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री स्वतः हातात झाडू घेऊन दादरचे रस्ते आणि गल्लीबोळ झाडताना पाहून बघ्यांनी एकच गर्दी केली सुरुवातीला अनेकांना ही स्टंटबाजी वाटली. वर्तमानपत्रांनी, व्यंगचित्रकारांनी तर मुख्यमंत्र्यांची टरही उडवली. पण, तो काही स्टंट नव्हता हे नंतर सर्वांच्या लक्षात आलं आणि मुख्यमंत्र्यांवर होणारी टीका ओसरली. मुंबईतल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. त्यामुळं मारोतराव कन्नमवार यांनी झाडू हातात घेतला होता. अखेर स्वच्छता कामगारांना संकोच वाटला आणि त्यांनी संप मागं घेतला.
मुख्यमंत्री म्हणून जवळपास एकच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ राहिला. पदावर असतानाच त्यांचं निधन झालं. चंद्रपूर जिल्ह्यातील मुलजवळील मारोडा हे मारोतराव कन्नमवार यांचं मूळ गाव. 10 जानेवारी 1900 रोजी चंद्रपूर येथे त्यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्वज जुन्या आंध्रप्रदेशातील कन्नम या गावचे म्हणून त्यांना आडनाव मिळालं कन्नमवार. त्यांचे आजोबा बेलदार म्हणजे घरं बांधणारे. पुढं तरुणपणी मारोतराव कन्नमवार यांच्यावर गांधी विचारांचा प्रभाव वाढत गेला आणि वयाच्या 18 व्या वर्षी त्यांनी भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेतला. त्यानंतर गांधींच्या विचारांच्या प्रेरणेतून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आपल्या मुलानं नोकरी-धंदा सोडून स्वातंत्र्य चळवळीत उतरणं वडलांना आवडलं नसल्यानं मारोतरावांनी वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय सुरू केला.
इतकंच नव्हे तर त्यांनी कापूस, धान्य, किराणा हे देखील व्यवसाय केले. गावोगावी जाऊन मालही विकला.
प्रसिद्ध पत्रकार आणि कादंबरीकार सुरेश द्वादशीवार यांच्या तारांगण पुस्तकात तर मारोतराव कन्नमवार यांच्यावर एक स्वतंत्र प्रकरणच आहे. ते प्रभावी वक्ते देखील होते. शहरापासून खेड्यापाड्यातही त्यांची भाषणं गाजायची. या भाषणावरून त्यांच्याविषयी गाजलेला एक भन्नाट किस्सा सांगतो आणि 1962 च्या विधानसभा निवडणुकीकडं वळतो… त्याकाळी लाउडस्पीकर काही परवडणारे नव्हते. त्यामुळं ते अगदी मोठ्या आवाजात भाषण देत आणि बोलता बोलता कधी श्रोत्यांमध्ये जात हे त्यांचं त्यांनाच कळायचं नाही. बोलण्याच्या ओघात ते खूपदा ते व्यासपीठाच्या पुढल्या टोकापर्यंत जात असत. मग त्यांना कुणीतरी धरून मागं आणत असे. त्यावेळी पंडित बालगोविंदजी हे चंद्रपूरच्या काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते. या पंडितजींनी
भाषण देताना पुढं पुढं सरकणाऱ्या कन्नमवारांना एका जागी खिळवून ठेवण्यासाठी त्यांच्या शर्टाच्या मागल्या बाजूला दोरी बांधण्याचा अफलातून आदेश तेव्हा काढला होता म्हणे! पुढं गेले की खेचा दोरी, पुढं गेले की खेचा दोरी! मात्र कोणताही दोर कन्नमवारांना काही थांबवू शकला नाही. असे हे अफलातून पण साधं सरळ व्यक्तिमत्त्व असलेले कन्नमवार 1952 मध्ये चंद्रपूर जिल्ह्यातील मूल सावली मतदारसंघातून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले. त्यांनी दळणवळणमंत्री, सार्वजनिक बांधकाममंत्री आणि आरोग्यमंत्री अशी विविध पदं भूषवली.
दरम्यानच्या काळात, चीनचं भारत-चीन युद्ध पेटलं आणि संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री बनलेल्या यशवंतराव चव्हाणांवर संरक्षणमंत्रिपदाची जबाबदारी आली. तेव्हा कन्नमवार उपमुख्यमंत्री होते. यशवंतराव चव्हाण केंद्रीय संरक्षणमंत्री झाल्यानंतर कन्नमवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री दुसरे मुख्यमंत्री बनले. 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर 1963 हा त्यांचा मुख्यमंत्रिपदाचा अल्प कार्यकाळ. कारण मुख्यमंत्रिपदावर असतानाच त्यांचं अकाली निधन झालं. मारोतराव कन्नमवार यांच्या आकस्मिक निधनानंतर महाराष्ट्राच्या हंगामी मुख्यमंत्रिपदाची सूत्रं बाळासाहेब सावंत यांच्याकडं आली आणि त्यानंतर वसंतराव नाईक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले.
आता 1962 च्या निवडणुकीत काय घडलं पाहुयात..
1 मे 1960 रोजी संयुक्त महाराष्ट्राची निर्मिती झाली आणि 1962 मध्ये पहिली विधानसभा निवडणूक लागली. काँग्रेससह शेतकरी कामगार पक्ष, प्रजा समाजवादी पक्ष, रिपाइं, सप, भाकप हे प्रमुख पक्ष निवडणूक रिंगणात उतरले. 264 जागांसाठी एकूण 1161 उमेदवार निवडणुकीला उभे राहिले. त्यात 1125 पुरुष, 36 महिला तर 437 अपक्ष उमेदवार होते. काँग्रेस, भारतीय जनसंघ, रिपाइं, शेकाप, स्वतंत्र पक्ष, रामराज्य परिषद, हिंदू महासभा, प्रजा समाजवादी पक्ष, सप, भाकप अशा एकूण 10 पक्षांनी आपापले उमेदवार उभे केले. काँग्रेसनं 264 तर शेकापनं 79 जागा लढवल्या तर प्रजा समाजवादी पक्षानं 101 आणि भाकपनं 56 जागा लढवल्या. रिपाइंनं 66 तर सपनं 14 जागा लढवल्या. अखेर निवडणुकीचा निकाल लागला आणि काँग्रेसनं 215 जागांवर विजय मिळवला. शेकापनं 15 जागा जिंकल्या तर प्रजा समाजवादी पक्षाला 09 जागा जिंकता आल्या. भाकपनं 06 तर रिपाइंनं 03 जागी विजय मिळवला. सपला 01 जागा जिंकता आली. या निवडणुकीत 36 पैकी 13 महिला उमेदवार आमदार बनल्या तर 437 अपक्षांपैकी 15 जण आमदार बनले. एकूण 10 पक्षांपैकी 06 पक्षांना जागा जिंकता आल्या तर उर्वरित 04 पक्षांना भोपळा देखील फोडता आला नाही.
एकूणच काय तर संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर झालेल्या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचं बहुमताचं सरकार बनलं आणि मारोतराव कन्नमवार मुख्यमंत्री बनले.
संदीप चव्हाण, वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी