राज्यात विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजण्यास सुरुवात झाली असून सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करताना पाहायला मिळतायत.. महायुती आणि महाविकास आघाडीच्या बरोबरच अनेक चेहरे अपक्ष म्हणूनही निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता व्यक्त केली जात असून यामुळेच अनेक राजकीय पुढार्यांना 1995 च्या त्या पॅटर्नची धास्ती पाहायला मिळते 1995 मध्ये नेमकं काय घडलं होतं यावरचा टॉप न्यूज मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट…
लोकसभेप्रमाणे महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यामध्ये थेट लढत होईल अशी शक्यता व्यक्त केली जात असतानाच काहीच दिवसांपूर्वी पुण्यात युवराज छत्रपती संभाजीराजे, माजी शिक्षण राज्यमंत्री आणि प्रहारचे अध्यक्ष बच्चू कडू आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी ‘परिवर्तन महाशक्ती’ म्हणत राज्याच्या राजकारणात नवा पर्याय निर्माण केलाय… राज्यातील बदललेली राजकीय समीकरण पाहता अनेक जण पक्षांचा आधार न घेता अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे आणि यामुळेच महाराष्ट्राची 2024 ची निवडणूक ही 1995 प्रमाणे चर्चेत येईल असा कयास राजकीय वर्तुळात बांधला जातोय. 1995 मध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीला धक्का देत राज्यात पहिल्यांदा शिवसेना भाजपा युतीचे सरकार अपक्षांच्या मदतीने बनलं होतं.
1995 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप युतीविरुद्ध काँग्रेस, अशी मुख्य लढत झाली होती ). त्यावेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेसनं 286 जागा लढवल्या तर शिवसेना-भाजप युतीनं अनुक्रमे 169 आणि 116 जागा लढवल्या. तर 3196 अपक्ष उमेदवारांनी या निवडणूक आपलं नशीब आजमावलं होतं. निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा काँग्रेसला अवघ्या 80 जागांवर विजय मिळाला. शिवसेना-भाजप युतीनं मात्र जोरदार मुसंडी मारली. शिवसेनेनं 73, तर भाजपनं 65 जागा जिंकल्या. तर तब्बल 45 अपक्ष उमेदवार आमदार बनले. आणि अपक्षांच्या मदतीने युती सरकार तयार झालं आणि शिवसेनेचे मनोहर जोशी मुख्यमंत्री तर भाजपाचे गोपीनाथ मुंडे राज्याचे उपमुख्यमंत्री बनले.