केवळ सीसीटीव्हीच्या आधारे चुकीच्या चुकीच्या संशयीतां ऐवजी खऱ्या आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. ही घटना पुण्यात घडली असून हा निगडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रकार आहे.
नेमकं प्रकरण काय ?
काही दिवसांपूर्वी निगडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका मद्य प्राशन केलेल्या तरुणाचे काही व्यक्तींबरोबर वाद झाले होते. हे वाद विकोपाला गेल्यानंतर सर्वांनी निगडी पोलीस ठाणं गाठलं. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी तक्रार दाखल करून घेतली. त्यानंतर दारूचे नशेत असलेला हा तरुण एका ट्रकमध्ये बसून तिथून निघून गेला. मात्र याच तरुणाचा दुसऱ्या दिवशी मृतदेह सापडला.
हे तरुणाचा मृतदेह म्हाळुंगे एमआयडीसीतील परिसरात असलेल्या नदीच्या काठावर सापडला. याची खबर पोलिसांना लागताच रात्री झालेल्या वादाच्या आणि पोलीस तक्रारीच्या रागात त्याच व्यक्तींनी तरुणाचा खून केला असल्याचा संशय पोलिसांना आला. चौकशीसाठी पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतलं. मात्र हे संशयीत आपण गुन्हा केला नसल्याचं सांगत असल्याने पोलिसांनी तपास सुरू ठेवला. आणि अखेर या तपासात वेगळच सत्य समोर आलं.
या तपासात संशयीत व्यक्ती गुन्ह्यात सहभागी नसल्याचे उघड झालं. मग हा खून नेमका कोणी केला याचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक सीसीटीव्ही कॅमेरे तपासले. त्यावरूनच खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोलीस पोहोचले. मयत तरुण हा पोलीस ठाण्यातून तक्रार दिल्यानंतर बाहेर पडला. ट्रकमध्ये बसून हा तरुण निघून गेला. मात्र काही अंतरावर ट्रक मधील चालकाशी आणि इतर एका इसमाशी त्याचे वाद झाले. या वादातून दोघांनी मिळून तरुणाला बेदम मारहाण केली. त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. याच चालकाने आणि त्याच्या साथीदाराने तरुणाचा मृतदेह नदीकाठी टाकून दिला व स्वतः पसार झाले. ही सगळी घटना पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या आधारावर तपासली. आणि अखेर या खुनाचा उलगडा झाला.