पुणे – महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या परीक्षांचा निकाल वेळेतच जूनमध्ये लागणार असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली आहे. उत्तरपत्रिका तपासणीचे काम प्रगतीपथावर असून त्यात कोणतीही अडचण नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
यंदा करोनाची परिस्थिती आटोक्यात आल्यामुळे ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेण्यात आल्या. बारावीची परीक्षा 7 मार्च ते 7 एप्रिल तर दहावीची परीक्षा 15 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीत घेण्यात आल्या.दहावी परीक्षेसाठी सुमारे 16 आणि बारावीच्या 15 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. ज्या शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेतात याच ठिकाणी त्यांना परीक्षा केंद्राची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे परीक्षा प्रक्रिया सुरळीत झाली.
त्यामुळे आता निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र राज्य शिक्षण मंडळाने वेळेत निकाल जाहीर होतील, असा दावा केला आहे .
ज्या विषयांचे पेपर झाले, त्याप्रमाणे त्यांच्या तपासणीचे कामकाजही शिक्षकांकडून करण्याला प्राधान्य देण्यात आले. काही शिक्षक संघटनांनी विविध प्रलंबित प्रश्न मार्गी न लागल्याने पेपर तपासणीवर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला होता. मात्र, उत्तरपत्रिका तपासणीच्या कामकाजावर कोणताही विपरीत परिणाम झालेला नसून, पेपर तपासणीची प्रक्रिया सुरळीत सुरू असल्याचे बोर्डाचे म्हणणे आहे. यंदाचा बारावीचा निकाल जूनच्या पहिल्या आठवड्यात, तर दहावीचा निकाल जूनच्या तिसऱ्या आठवड्यात जाहीर करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती राज्य शिक्षण मंडळाकडून देण्यात आली.