‘स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढायच्या आहेत’; अजित पवारांची मोठी घोषणा
आज पुण्यामध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. ‘लोकसभा- विधानसभा निवडणुका आपण एकत्र लढत असलो तरीही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत’, असे विधान अजित पवार यांनी केले. ज्यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
पुण्यामध्ये आज राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. या मेळाव्यात अजित पवारांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. त्याचवेळी बोलताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या आपल्याला स्वबळावर लढायच्या आहेत, असे मोठे विधान केले. त्यामुळे महायुतीतील सर्वांनी भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे महायुतीमध्ये सारं काही अलबेल नसल्याच्या चर्चा वारंवार रंगत असतात. त्यातच आता फक्त अजित पवारांनी असे वक्तव्य केल्यामुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस सर्व जागांवर स्वबळावर लढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यावेळी अजित पवारांनी विधानसभा निवडणुका या ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यात किंवा नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात होतील, असा अंदाजही व्यक्त केला.
अजित दादांची सुनील टिंगरे यांना क्लीन चीट
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांची भूमिका संशयास्पद असल्याचे वारंवार बोलले गेले. बिल्डर विशाल अग्रवाल याच्याशी टिंगरेंचे जवळचे संबंध असल्यामुळे आणि सुनील टिंगरे स्वतः येरवडा पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र अपघात ग्रस्तांना बघायला गेले नाही, यावरून वारंवार टीका होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज अजित पवार म्हणाले की, कल्याणी नगर अपघात प्रकरणात सुनील टिंगरे यांची चौकशी झाली आहे. चौकशीतून काहीही समोर आलं नाही. विनाकारण लोकप्रतिनिधींची बदनामी काही लोक करत आहेत. मतदार संघातील नागरिकाचा फोन आल्यानंतर आमदार म्हणून मदतीला जावं लागतं. पण विनाकारण टिंगरे यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे, अशी टीका विरोधकांवर केली.