नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये शरद पवार गटाने तुतारी या चिन्हावर निवडणुक लढवली होती. मात्र त्याच वेळी काही अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह निवडणूक आयोगातर्फे देण्यात आले होते. पिपाणी आणि तुतारी या दोन्ही चिन्हांमध्ये साम्य असल्यामुळे काही जागांवर शरद पवार गटाच्या उमेदवारांना फटका बसला. शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या वाट्याची मतं अपक्ष उमेदवारांना मिळाली, हे स्पष्ट झाले होते. त्यामुळेच पिपाणी हे चिन्ह रद्द करण्यात यावे अशी मागणी शरद पवार गटाच्या वतीने करण्यात आली होती. त्यांच्या मागणीला आता यश आले आहे.
लोकसभा निवडणुकीत दिंडोरी मतदार संघामध्ये पिपाणी चिन्हावर लढलेल्या उमेदवाराला तब्बल एक लाख 3000 मत मिळाली होती. तर बीडमध्ये पिपाणी चिन्ह असलेल्या उमेदवाराला 55 हजारांपेक्षा जास्त मतं मिळाली होती. तसेच साताऱ्यातील देखील अपक्ष उमेदवाराला तब्बल 37 हजार मतं मिळाली होती. पिपाणी आणि तुतारी या चिन्हांमध्ये साम्य असल्यामुळे मतदारांचा चिन्ह ओळखण्यामध्ये गोंधळ झाला. ज्यामुळे तुतारीच्या वाट्याची मतं पिपाणीला मिळाली. ज्यामुळे एका जागेवर शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव झाला. काही ठिकाणी विजयी उमेदवारांचे मताधिक्य घटले. त्यामुळे जे नुकसान लोकसभा निवडणुकीत झाले तसेच पुन्हा विधानसभेत होऊ नये, यासाठीच ते पाणी चिन्ह रद्द करण्याची मागणी शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाला करण्यात आली होती. आता या मागणीची दखल घेत निवडणूक आयोगाने हे चिन्ह गोठवले आहे. ज्यामुळे विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाच्या उमेदवारांचा विजयाचा मार्ग सुकर झाला आहे.