इतर मागासवर्गीय समाजाच्या (ओबीसी) विविध मागण्या केंद्र सरकारकडे प्रलंबित आहेत पण केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार जाणीवपूर्वक त्याकडे दुर्लक्ष करुन ओबीसी समाजावर अन्याय करत असून संविधानाने आपल्याला अधिकार दिलेले आहेत पण केंद्रातील सरकार संविधान धाब्यावर बसवून काम करत आहे. ओबीसी समाजावर होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आता पेटून उठण्याची वेळ आली आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले आहे.
शेगाव येथे ओबीसी समाज अधिकार संमेलन पार पडले. यावेळी नाना पटोले बोलत होते. या संमेलनाला छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बघेल, महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व सहप्रभारी आशिष दुआ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव व पंजाबचे सहप्रभारी हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे डॉ. बबनराव तायवाडे, आ. अमित झनक, आमदार राजेश एकडे, प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, प्रदेश सरचिटणीस देवानंद पवार, काँग्रेस जिल्हाध्यक्ष व माजी आमदार राहुल बोंद्रे, माजी आमदार दिलीप सानंदा, प्रदेश सरचिटणीस शाम उमाळकर, स्वाती वाकेकर, रवी महाले, मंगेश भारसाखळे आदी उपस्थित होते.