Manoj Jarange : “सरकार कोसळलं तर आरक्षण…”, संजय राऊतांच्या वक्तव्यावर मनोज जरांगेंनी केले मोठे वक्तव्य; म्हणाले…
मुंबई : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी मराठा आरक्षणासाठी चालू केलेलं बेमुदत उपोषण गुरुवारी मागे घेतलं. यावेळी त्यांनी सरकारला आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं आहे की, त्यांनी राज्य सरकारला 24 डिसेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. तर सरकारने म्हटलं आहे की, जरांगे-पाटलांनी त्यांना 2 जानेवारी 2024 पर्यंतची मुदत दिली आहे. मुदतीच्या तारखेवरून गोंधळ सुरू असतानाच शिवसेनेच्या ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे.
काय म्हणाले संजय राऊत?
“मनोज जरांगे-पाटलांनी 24 डिसेंबर, तर राज्य सरकारने 2 जानेवारीची मुदत दिली आहे. पण, 31 डिसेंबरला राज्यातलं घटनाबाह्य सरकार जाणार आहे. त्यामुळे सरकार आरक्षणाची जबाबदारी घेण्यास तयार नाही. हे गद्दारांचं घटनाबाह्य सरकार महाराष्ट्रात राहणार नाही. म्हणून जरांगे-पाटलांनी 24 डिसेंबर ही तारीख दिली आहे. तर, सरकारला कळून चुकलंय की 31 डिसेंबरला आपलं शीर उडणार आहे. त्यामुळे आरक्षणाची जबाबदारी नको म्हणून, त्यांनी जरांगे पाटलांना 2 जानेवारी ही तारीख दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता मनोज जरांगे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
मनोज जरांगे म्हणाले, ते संजय राऊतांचं राजकीय वक्तव्य आहे. मी त्यावर काही बोलणार नाही. परंतु, माजी न्यायमूर्ती, आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळासमोर 24 डिसेंबर ही तारीख ठरली आहे. संजय राऊतांचं वक्तव्य राजकीय आहे, त्याचा सामाजिक प्रश्नाशी संबंध नाही.
