मुंबई : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्यावर आज मुंबईत सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत मनोज जरांगे यांना उपोषण मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले. या बैठकीत मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्व पक्षांचे एकमत झाले. तसंच मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं असं आवाहनही केलं. यानंतर आता मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला वेळ किती आणि आता कशाला हवाय असा प्रश्न विचारला. सरसकट महाराष्ट्राला आरक्षण लगेच देणार का सांगावं मग समाजाशी बोलून विचार करू अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी मांडली.
काय म्हणाले जरांगे पाटील ?
मनोज जरांगे पाटील म्हणाले माझ्याकडे आजच्या बैठकीचा तपशील आला नाही आणि मला इच्छाही नाही तपशिलात जायची. माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचे विनाकारण मुडदे पडायला लागलेत. मराठा समाज अडचणीत सापडला असताना त्यांच्याकडे लक्ष न देता हे जाणूनबुजून बैठका घेण्यात वेळ घालवतायत. हे हसण्यावारी नेतायत, गोरगरिबांच्या लेकरावर गुन्हे दाखल करण्याचं काम सरकार करतंय.
तुम्हाला तुमच्याबद्दल बोललेलं वाईट वाटतं, पण आमची लेकरं हाल सहन करत असलेलं दिसत नाही. तुम्हाला वाईट बोललं की निरोपावर निरोप येतात. तुम्ही मराठ्यांना आरक्षण द्या, तुम्हाला वेळ कशाला, का पाहिजे? महाराष्ट्रातल्या सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देणार का हे सांगा, आम्ही मराठा समाजाशी बोलून सांगतो. तुमच्या मनात काय आहे ते कळुदे असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले.