मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी (Sharad Pawar) आज पत्रकार परिषद घेत राज्यात घडणाऱ्या अनेक घडामोडींवर भाष्य केलं. पंतप्रधान मोदींनी शिर्डी दौऱ्यावेळी भर सभेत बोलत असताना शरद पवारांवर निशाणा साधला होता. शरद पवारांनी कृषीमंत्री असताना देशातील शेतकऱ्यांसाठी काय केलं? असा सवाल मोदींनी उपस्थित केला होता. त्यावर आजच्या पत्रकार परिषदेत बोलताना शरद पवारांनी पंतप्रधान मोदींच्या टीकेवर जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
नेमके काय म्हणाले शरद पवार?
“दोन दिवसापूर्वी देशाचे पंतप्रधान यांनी साईबाबाच दर्शन घेतल्यानंतर कृषी खात्याबाबत काही मुद्दे मांडले. प्रधानमंत्री हे पद संस्थात्मक आहे. त्याची प्रतिमा राखायला हवी असं मला वाटतं. या पदाची प्रतिमा राखून त्यांनी जी माहिती दिली. त्याबाबत मी बोलणार आहे. 2004 ते 2014 कृषीमंत्री मी होतो. 2004 ला देशात अन्न धान्य टंचाई होती. त्यावेळी पहिल्याच दिवशी कटू निर्णय मला घ्यावं लागला. अमेरिकेकडून गहू आयात करायला लागला. 2 दिवस मी त्या फाईलवर सही केली नव्हती. मी अस्वस्थ झालो होतो. त्यानंतर मनमोहन सिंह यांचा फोन आला. 3 ते 4 आठवड्यात आपल्या समोरं अडचण येऊं शकते, असं त्यांनी मला सांगितलं. त्यामुळं मी सही केली.” असे शरद पवार म्हणाले.
काय म्हणाले होते पंतप्रधान मोदी?
नरेंद्र मोदी अहमदनगरच्या शिर्डी दौऱ्यावर होते. यावेळी शिर्डीजवळील काकडी गावात सार्वजनिक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी शरद पवार यांच्यावर अजित पवार त्यांच्यासमोरच टीका केल्याचे दिसून आले. मोदी म्हणाले की, ‘महाराष्ट्रातील एक नेते अनेक वर्ष केंद्र सरकारमध्ये कृषीमंत्री म्हणून काम करत होते. मात्र त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी यावेळी केला.