हिंगोली : हिंगोली (Hingoli News) जिल्ह्यातुन एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये एका शेतकऱ्याने नापीकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली आहे. नारायण खोडके असं या शेतकऱ्याचं नाव आहे. हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील शेगाव खोडके गावात ही घटना घडली आहे. खोडके यांनी आत्महत्या केल्यामुळे त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. यादरम्यान खोडके यांची मुलगी इयत्ता आठवीत शिकत असून या चिमुकलीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहलं आहे. किरण खोडके असं या चिमुकलीचे नाव आहे. सध्या सोशल मीडियावर किरण खोडके हिने मुख्यमंत्र्याना लिहिलेलं पत्र व्हायरल होताना दिसत आहे.
काय लिहिले आहे पत्रामध्ये?
‘सर, तुमचा दसरा चांगला गेला, तुमची दिवाळी पण चांगली जाणार. आमच्या घरी दसरा नाही, दिवाळी नाही. आई रडत असते. सारखी म्हणते मालाला भाव असते तर तुझा बाबा मेला नसता. वावरात सोयाबीन कमी झालं. आई न बाबाचं भांडण झालं, आणि आमचा बाबा पुन्हा आला नाही. आजीला विचारलं तर ती म्हणते देवाघरी गेला. सर देवाचं घर कुठं आहे. त्याचा नंबर द्या आणि माझ्या बाबांना पाठवा लवकर, दिवाळी येणार आहे, आमच्या घरी दोन दीदी मी आणि दादा आहोत, रोज बाबाची वाट पाहतो, पण ते येत नाहीत. मग आम्हाला दिवाळीला बाजारात कोण नेईल, कपडे कोण घेईलं?, असा सवाल तिने केला आहे. देवाला आम्ही सांगून बाबाला पाठवा आम्हाला दिवाळी बाजार आणायचा आहे. त्यांना म्हणावं तुमची दीदी खूप रडतेय, मग ते लवकर येतील, असं चिमुकलीने म्हटलं आहे. चिमुकलीचे हे शब्द ऐकून तुमच्या डोळ्यांत पाणी आल्याशिवाय राहणार नाही.
चिमुकलीने मुख्यमंत्र्यांना लिहलेल्या या पत्राची एकच चर्चा आहे. चिमुकलीच्या या पत्रावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.