बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आज भगवान गडावरून जाहीर सभा घेतली. या सभेला हजारोंच्या संख्येने लोक आले होते. भर उन्हात हि सभा पार पडली. यावेळी पंकजा मुंडे यांनी जोरदार भाषण केले. आपल्या भाषणादरम्यान त्यांनी विरोधकांना सज्जड दमदेखील भरला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
काय म्हणाल्या पंकजा मुंडे ?
पंकजा मुंडे पक्षांतर करणार असल्याच्या सातत्याने चर्चा होत असतात. या चर्चांनाही त्यांनी पूर्णविराम दिला आहे. त्या म्हणाल्या की, पंकजा मुंडेची निष्ठा एवढी लेचीपेची नाही. पदं देऊन देऊनही तुम्हाला निष्ठा मिळवता आली नाही. पदं न देताही निष्ठा काय असते ते या लोकांना विचारा. यांच्या मनावर हजार आघात आले. दहा वेळा यांचं स्वप्न तुटलं. पण पुन्हा यांच्या डोळ्यांत स्वप्न जन्म घेत आहे. (निवडणुकीत) पडले तर पडले. कोण पडत नाही? ब्रह्मा, विष्णू महेशही आपल्या युद्धात हरले होते. श्रीदेवांनाही युद्धाचं संकट आहे. देवीलाही आसुरांविरोधात युद्ध करावं लागतं. मग युद्धाला आपण का तयार राहणार नाही? असा प्रश्नही पंकजा मुंडे यांनी विचारला. “न जाने मुझे कैसे परखता है मेरा उपरवाला.. इम्तेहान सख्त लेता है मगर हारने नहीं देता है.. असा शेरही पंकजा मुंडे यांनी आपल्या भाषणादरम्यान मारला.