मुंबई : कंत्राटी भरतीच्या (Contractual Recruitment) मुद्यावरून राज्यात राजकारण चांगलंच तापलंय, कारण महाविकास आघाडी सरकारचे पाप आपल्या माथी नको, असं म्हणत उपमुख्यमंत्री फडणवीसांनी जीआर रद्द केला, त्यावरुन पुन्हा एकदा राजकारण तापलं आहे. आजचं भाजपचं आंदोलन म्हणजे उलटा चोर कोतवाल को दाँटे, असं म्हणत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली तसेच आम्ही काढलेला जीआर दीड वर्षे का बदलला नाही? असा सवालदेखील वडेट्टीवारांनी यावेळी उपस्थित केला. त्यावर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले कंत्राटी कामगारांचे षडयंत्र मागच्या सरकारच्या काळात झालं, पण विरोधकांनी आम्हाला बदनाम केलं, म्हणून आम्ही माफी मागो आंदोलन केले.
सुप्रिया सुळेंची टीका
कंत्राटी भरतीच्या जीआरवरुन सुप्रिया सुळे यांनी भाजपवर टीका केली आहे. कंत्राटी भरतीच्या जीआरवर ज्या नेत्यांनी सही केली आहे, ते नेते आज सत्तेत आहेत, त्यामुळे देवेंद्र फडणवीसांनी त्या नेत्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे, तसंच आमच्या दबावामुळे कंत्राटी भरतीचा जीआर रद्द करण्यात आल्याचंही सुप्रिया म्हणाल्या.
सुप्रिया सुळेंनी ‘या’ नेत्यांचे राजीनामे घेण्याची केली मागणी
‘जीआरच्या कॅबिनेट मीटिंगमध्ये कोण कोण होतं? एकनाथ शिंदे, अजित पवार, दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, उदय सामंत, धनंजय मुंडे, शंभुराज देसाई, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार हे सगळे त्या कॅबिनेटला हजर होते, त्यामुळे माझी देवेंद्र फडणवीस आणि भाजप नेत्यांना विनंती आहे की ज्यांच्या सह्या आहेत त्यांचे राजीनामे घ्या,’ अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.