मुंबई : अक्षय कुमार आणि बायोपिक हे जणू समीकरणच (Oscar Awards 2024) बनलं आहे. त्याचे आजवरचे पॅडमॅन, केसरी आणि रुस्तम हे सत्य घटनेवर आधारित चित्रपट हिट झाले. त्यानंतर त्याचा असाच एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस आला आहे. अक्षय कुमारचा ‘मिशन राणीगंज’ हा चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये दाखल झाला. या चित्रपटात अक्षय कुमार जसवंत सिंग गिलची भूमिका साकारत आहे. जसवंत सिंग यांनी खाणीत काम करताना अडकलेल्या लोकांचे प्राण कसे वाचवले अशी चित्रपटाची कथा आहे. एका सत्य घटनेने प्रेरित असलेल्या या चित्रपटाला समीक्षकांकडून भरभरून दाद मिळाली. आता या चित्रपटाविषयी एक चांगली माहिती समोर आली आहे.
‘मिशन राणीगंज’ ची कथा 34 वर्षांपूर्वी म्हणजेच 1989 मध्ये पश्चिम बंगालच्या राणीगंजमध्ये एक अपघात झाला होता त्यावर आधारित आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आयआयटी धनबादमधील खाणीत काम करणारा अभियंता जसवंत सिंग गिलची भूमिका साकारत आहे. या इंजिनीयरने आपल्या धाडसाने 65 खाण कामगारांचे प्राण वाचवले. अशा प्रकारे घडलेली भारतातील ही पहिलीच घटना होती. आता समोर आलेल्या माहितीनुसार, या चित्रपटाचे निर्माते ‘मिशन राणीगंज’ ऑस्करसाठी पाठवण्यात येणार आहे.
दरवर्षी चाहते ऑस्कर पुरस्काराची आतुरतेने वाट पाहत असतात. पुढील वर्षी, 96 वा अकादमी पुरस्कार 10 मार्च, 2024 रोजी लॉस एंजेलिसमध्ये आयोजित केले जातील. या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या यादीत कोणत्या हॉलीवूड आणि भारतीय चित्रपटांनी नामांकनात आपले स्थान निर्माण केले आहे, याची घोषणा 23 जानेवारीला होणार आहे.