Aishwarya Katta

Aishwarya Katta : उत्तुंग व्यक्तिमत्वानी उंचावली ऐश्वर्य कट्ट्याची शान!

565 0

पुणे : ऐश्वर्य कट्ट्यावर (Aishwarya Katta) गप्पांची अनोखी मैफल आज रंगली. आजचे कट्ट्याचे मानकरी सर्वार्थाने विशेष होते. पद्मश्री मुरलीकांत पेटकर यांच्या उपस्थितीने चार चांद लागले.1965 च्या युद्धात ज्यांनी आपल्या शरीरावर अकरा गोळ्या झेलल्या… तब्बल 476 पदके पटककावून पदकांचा राजा अशी ज्यांनी ओळख प्रस्थापित केली….स्विमिंगमधे जागतिक विक्रम प्रस्थापित करून भारताला पॅराऑलिम्पिकमधे पहिले सुवर्णपदक मिळवून दिले.. अशा माध्यमातून देशाची मान उंचावणारे मुरलीकांत पेटकर आज कट्ट्यावर आल्याने कट्ट्याची शान आणखीनच वाढली.

संचेती हॉस्पिटलची मोठी जबाबदारी संचालक म्हणून आपल्या खांद्यावर घेतलेले नामांकित सर्जन डॉ. अजय कोठारी हे असेच आणखी एक महनीय व्यक्तिमत्व आज उपस्थित होते. याशिवाय, गणेशोत्सवाचा चालता बोलता इतिहास असे ज्यांचे वर्णन करता येईल असे सामाजिक कार्यकर्ते आनंदजी सराफ आणि नागरिकांच्या सुरक्षेसाठी सदैव दक्ष असणारे भारती विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायकजी गायकवाड कट्ट्याचे मानकरी होते. शंखनाद करून आणि औक्षण करून या मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शाल, मोत्याची माळ, शिंदेशाही पगडी, सन्मानपत्र देऊन या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.

मयूरकांत पेठकर सरांची चित्तथरारक वाटचाल त्यांच्या सहकाऱ्यांनी कथन केली. त्यांचा विलक्षण जीवन प्रवास ऐकून सगळेच थक्क झाले.
Happiness is best diet असा संदेशही पेठकर सरांनी सर्वांना दिला आणि फिटनेसचे महत्त्व सर्वांना सांगितले. आपल्याला मिळणारी पेन्शन स्वतःसाठी न वापरता 200 विधवा महिलांना ते दान करतात ही विधायक माहिती यानिमित्ताने मिळाली. सुरमा हा चित्रपट ज्यांच्यावर निघाला आहे त्या सैन्यदलातील संदीप सिंग यांच्या मणक्यातील गोळी आपण काढून त्यांचा जीव वाचवला होता ही आठवण डॉ. कोठारी यांनी सांगितली. यूएस मधे सेटल होण्याची संधी असताना गुरु डॉ. संचेती यांनी दिलेल्या शिकवणकीमुळे मातीची सेवा करण्यासाठी भारतात परतलो असे त्यांनी आवर्जून सांगितले.

शेतकरी कुटुंबातून येऊन वडिलांच्या संस्कारामुळे प्रामाणिकपणे पोलीस दलात सेवा करतोय. मोठ्या बंधूच्या प्रोत्साहनामुळे पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालो. ग्रामीण भागातून वाटचाल करीत हे यश संपादन केले.. अशी माहिती विनायक गायकवाड यांनी दिली. कोरोनाच्या काळात कोंढवा परिसरात केलेल्या कामाची माहिती त्यांनी दिली. गणेशोत्सव काळात उत्तम कामं करण्यावर भर दिला हे सांगताना अनेक किस्से उलगडले. आनंद सराफ यांनी गणेशोत्सवातील अनेक किस्से, लता मंगेशकर यांनी मंडईत दिलेली भेट, सैनिक मित्र परिवाराच्या माध्यमातून केलेले काम आणि बदलता गणेशोत्सव या विषयी रसिकतेने माहिती दिली आणि उपस्थितांची मने जिंकली. या चारही जणांच्या अनुभव समृद्धीने आज कट्टा सर्वार्थाने वेगळ्या उंचीवर पोहोचला. यावेळी सर्व आप्पा रेणुसे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!