मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपान दौऱ्यावरून सध्या राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित करत भाजपवर जोरदार हल्लाबोल केला होता. त्यांच्या या टीकेला भाजप नेते आशिष शेलार यांनी जोरदार समचार घेतला. आता आदित्य ठाकरे यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे.
काय म्हणाले आदित्य ठाकरे?
एका आदू बाळानं यांना सळोकीपळो करून टाकलं आहे. देशात एकाचं नाव यांनी पप्पू ठेवलं त्याने यांना हालवून सोडलं. माझ्या नावापुढे त्यांनी बाळ जोडलं याचा मला अभिमान आहे. कारण माझ्या आजोबाच्या नावात बाळ होतं. त्यांनी जी भाषा वापरली त्याच्यामधून त्यांचं फ्रस्ट्रेशन दिसून येत आहे. ही भाजपची नवी भाषा आहे का? कारण आम्हाला जो भाजप माहिती आहे तो वाजपेयी, अडवानी यांचा भाजप आहे, असा टोला आदित्य ठाकरे यांनी यावेळी लगावला.
आशिष शेलार काय म्हणाले होते?
‘उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जपानच्या दौर्याचा संपूर्ण खर्च हा जपान सरकारने केला, कारण, मुळातच त्यांना निमंत्रण हे शासकीय अतिथी म्हणून जपान सरकारने दिले होते. अतिथी म्हणून निमंत्रण येते, तेव्हा त्यांचा खर्च हा जपान सरकार करीत असते. महाराष्ट्र सरकारने केवळ सोबत जाणार्या अधिकार्यांचा खर्च केलेला आहे’. ‘जपान दौर्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय केले आणि किती गुंतवणूक आली, याची संपूर्ण टाईमलाईन त्यांच्या समाजमाध्यमावर उपलब्ध आहे. मोठी गुंतवणूक त्यांच्या या दौर्यामुळे आली आहे. वाचली नसेल तर पुन्हा एकदा वाचून घ्यावी. बाप आजारी असताना सरकारी पैशावर लंडनमध्ये मजा मारणार्याने दुसर्यांना शहाणपण शिकवायचे नसते. बालबुद्धीपणामुळे असे होते, हे मान्य आहे. पण, त्याचा कळस गाठू नका !’ असे आशिष शेलार म्हणाले.