पुणे : काही दिवसांपूर्वी शासनाकडून कंत्राटी (Contract Recruitment) तहसीलदार नियुक्तीबाबतची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या जाहिरातीवरून राज्यात मोठा गोंधळ उडाला होता. ही जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला तर दुसरीकडे स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी देखील या जाहिरातींवरून नाराजी व्यक्त केली होती. यामळे सरकारची मोठी गोची झाली होती. यानंतर सरकारने या प्रकरणी दखल घेतली. कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंबंधीची जाहिरात तात्काळ रद्द करा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. यादरम्यान महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या जाहिरातीबाबत खुलासादेखील केला आहे.
काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील ?
कंत्राटी तहसीलदार नियुक्तीसंबंधीची जाहिरात तात्काळ रद्द करा असे आदेश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. याबाबत खुलासा करताना ते म्हणाले की, कंत्राटी पद्धतीनं तहसीलदारांची पदं भरण्याचं शासनाचं कुठलही धोरण नाही. जळगाव जिल्ह्यात भुसंपादनाच्या कामासाठी अनुभवी लोकांची गरज होती. म्हणून ती जाहिरात काढली होती, शासनाची ही पुर्वपद्धत आहे. पण या नियुक्तीची जाहिरात काढली गेल्याने आता कंत्राटी पद्धतीनेच तहसीलदार भरती होणार, असा गैरसमज झाला असं विखे पाटील म्हणाले आहेत.