‘तीन अडकून सीताराम’ हा चित्रपट (Teen Adkun Sitaram) गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. त्या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. या चित्रपटातील ‘दुनिया गेली तेल लावत’ हे तीन बिनधास्त मित्रांचे बिनधास्त गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. सध्या हे गाणे ट्रेंडिंगला चालत आहे. परदेशात व्हेकेशनला गेलेल्या तीन मित्रांची धमाल आपल्याला या गाण्यातून पाहायला मिळत आहे. दुनियाची पर्वा न करता बेफीकर असलेले हे मित्र व्हेकेशनचा पुरेपूर आनंद लुटताना दिसत आहेत.
हे गाणे जयदीप वैद्य, गोपाळ ठाकरे, हृषिकेश रानडे आणि आरती केळकर या युवा गायकांनी गायले आहे. तर ॲग्नेल रोमन यांनी हे गाणे संगीतबद्ध केले असून वैभव जोशी यांनी हे गाणे लिहिले आहे. वैभव तत्ववादी, अलोक राजवाडे, संकर्षण कऱ्हाडे, प्राजक्ता माळी यांच्यावर हे गाणे चित्रीत करण्यात आले आहे. फुलवा खामकर यांनी या गाण्याचे नृत्य दिग्दर्शन केले आहे.
तीन अडकून सीताराम या चित्रपटाविषयी बोलायचे झाले तर या चित्रपटात वैभव तत्ववादी, संकर्षण कऱ्हाडे, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी, गौरी देशपांडे, आनंद इंगळे, समीर पाटील, विजय निकम आणि हृषिकेश जोशी यांच्या महत्वाच्या भूमिका आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन देखील हृषिकेश जोशी यांनी केलं आहे. हा चित्रपट 29 सप्टेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे.