सांगली : सांगलीमध्ये (Sangli News) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये मिरजेच्या कृष्णात धुणे धुण्यासाठी पाच परप्रांतीय तरुण गेले होते. धुणे धुवत असताना यातील दोघांचा पाय घसरला. एकमेकाला आधार देण्याच्या नादात हे पाचही जण नदीपात्रात बुडाले. यातील तिघांना ओम सुरज पाटील यांनी बाहेर काढले, तर रामस्वरूप यादव (वय 23, जयपूर राजस्थान), जितेंद्र यादव (वय 21 रा. जयपूर राजस्थान) या दोघा जणांचा बुडून मृत्यू झाला. या घटनेची नोंद गांधी चौकी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
काय घडले नेमके?
मिरज कृष्णाघाटावर सकाळी सुभाषनगर रोडवरील दत्त कॉलनी येथे जयपूर येथील पाच परप्रांतीय मजूर राहतात. हे सर्वजण फरशीची कामे करतात. सकाळी ते कृष्णानदी पत्रात धुणे धुण्यासाठी म्हणून उतरले होते. धुणे धुवत असताना असताना दोघांचा अचानक पाय घसरल्याने तोल गेला आणि एकमेकांला धरण्याच्या नादात सर्व पाच जण पाण्यात बुडाले. सर्वत्र आरडाओरडा सुरू झाला. यादरम्यान त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या ओम सुरज पाटील या युवकाने तात्काळ पाण्यात उडी मारून तिघांना बाहेर काढले.मात्र बाकी दोघांना वाचवण्यात त्याला अपयश आले.
या दोघांच्या शोधासाठी दिवसभर आयुष्य सेवाभावी संस्था, वजीर रेस्क्यू टीम औरवाड, अग्निशमन दल मिरज यांना पाचारण करण्यात आले. अखेर रामस्वरूप यादव व जितेंद्र यादव या दोघांचा मृतदेह शोधण्यात रेस्क्यू टीमला यश आले. यावेळी अग्निशमन दलाचे संभाजी सलगर, बाळासो पुणेकर, विक्रम कोरे रेस्क्यू टीमचे अविनाश पवार, सुरज शेख, अपूर्व कांबळे, चिंतामणी पवार, अमोल हटकर, सचिन कचरे, इम्तियाज बोरगावकर यांनी शोध मोहीम राबविली. महात्मा गांधी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक नितीन कुंभार, पोलीस हवालदार चंद्रकांत जाधव, पोलीस हवालदार विनायक झांबर हे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.