नागपूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना नागपूर जिल्हा सत्र न्यायालयाकडून दिलासा देण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शपथपत्रात गुन्ह्याची माहिती लपवल्याप्रकरणी याचिका दाखल करण्यात आली होती. देवेंद्र फडणवीसांनी ज्या प्रकरणांची माहिती लपवून ठेवल्याचा आरोप होता ती खासगी होती. त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार होता असं वाटत नाही असा निर्णय देत कोर्टाने देवेंद्र फडणवीस यांना दोषमुक्त केले आहे. या सुनावनीला याचिकाकर्ते सतीश उके हे सुद्धा कारागृहातून ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हजर होते.
काय आहे प्रकरण?
देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्याची माहिती लपवल्याचा आरोप होता. अॅड. सतीश उके यांनी हा आरोप केला होता. प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी संग्राम जाधव यांनी सर्व बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर या प्रकरणाचा निर्णय राखून ठेवला होता. अखेर आज त्याप्रकरणी निर्णय देण्यात आला आहे. कोर्टाने देवेंद्र फडणवीसांना या प्रकरणी दोषमुक्त केलं आहे.
2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याविरोधात दाखल असलेल्या दोन गुन्ह्यांची माहिती लपवली असा आरोप अॅड. सतीश उके यांनी केला होता. दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांच्या वकिलांनी नजरचुकीने हे गुन्हे शपथपत्रात नमूद करण्याचे राहून गेले होते असा दावा केला होता. याप्रकरणी कोर्टाने निर्णय देताना सांगितलं की, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्या गुन्ह्यांची माहिती लपवून ठेवली होती असा आरोप करण्यात आला ती खासगी प्रकऱणं होती. त्याचा निवडणुकीवर कोणताही परिणाम होणार होता असं वाटत नाही. त्यामुळे त्यांना दोषमुक्त करण्यात येत आहे. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना मोठा दिलासा मिळाला आहे.