मुंबई : शास्त्रीय गायिका मालिनी राजूरकर (Malini Rajurkar) यांचे निधन झाले आहे. त्या ग्वाल्हेर घराण्यातील शास्त्रीय गायिका (Malini Rajurkar) होत्या. मालिनी राजूरकर यांचे पार्थिव हैदराबाद येथील त्यांच्या निवासस्थानी 5:30 ते 6:30 या वेळेत दर्शनसाठी ठेवण्यात येणार आहे. मालिनी राजूरकर यांच्या निधनाने संगीत क्षेत्रात शोककळा पसरली असून एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
मालिनी राजूरकर यांच्याविषयी थोडक्यात माहिती
मालिनी राजूरकर यांचा जन्म 8 जानेवारी 1941 रोजी झाला. त्यांचे बालपण राजस्थानमध्ये गेले. त्या तीन वर्षे अजमेरच्या सावित्री गर्ल्स हायस्कूल आणि कॉलेजमध्ये गणित शिकवले. तिथेच त्यांनी गणित या विषयात पदवी घेतली. अजमेर संगीत महाविद्यालयातून गोविंदराव राजूरकर आणि त्यांचा पुतण्या वसंतराव राजूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली संगीत निपुण अभ्यासक्रम पूर्ण केला. नंतर वसंतराव राजूरकर यांच्यासोबत मालिनी यांनी लग्न केले.
संगीत महोत्सवात सादर केली कला
मालिनी यांनी अनेक संगीत महोत्सवात त्यांची कला सादर केली. गुणीदास संमेलन (मुंबई), तानसेन समारोह (ग्वाल्हेर), सवाई गंधर्व महोत्सव (पुणे) आणि शंकर लाल महोत्सव (दिल्ली) या संगीत महोत्सवांमध्ये मालिनी राजूरकर यांनी त्यांची कला सादर केली.
अनेक पुरस्कारांनी करण्यात आले सन्मानित
मालिनीताईंना अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. त्यांना 2001 मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. तर 2008 मध्ये त्यांना दीनानाथ मंगेशकर पुरस्काराने गौरवण्यात आले होते. बागेश्री,यमन आणि मारवा इत्यादी रागांचे त्यांनी गायन केले. मालिनी राजूरकर यांच्या निधनामुळे संगीत क्षेत्रात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे.