नागपूर : प्रेमात, नैराश्यात तरुणांनी धक्कादायक पाऊलं उचलल्याच्या अनेक घटना आपण पाहिल्या असतील. अशीच एक धक्कादायक घटना नागपूरमध्ये (Nagpur Crime News) घडली आहे. नागपूर जिल्ह्यातील पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात एका तरुण-तरूणीने एकाच दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
काय घडले नेमके?
गौरव बगमारे आणि जान्हवी नायले असे आत्महत्या करणाऱ्या तरुण तरुणींचे नाव आहे.नागपुरच्या पारशिवनी तालुक्यातील पेंढरी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. दोघे सध्या वेगवेगळ्या महाविद्यालयात शिक्षण घेत होते.काल मध्यरात्रीचा सुमारास गौरव बगमारेच्या घराशेजारील वापरात नसलेल्या घरात दोघे गेले आणि तिथेच गळफास घेत आत्महत्या केली. आज सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याची माहिती देण्यात आली.
या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतले आणि याप्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद केली. दोघांवर काही दबाव होता का आणि त्याचा आत्महत्येशी संबंध आहे का याचा तपास पोलीस करत आहे. या दोघांनी नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली हे मात्र अद्याप समजू शकलेले नाही. मात्र या दोघांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.