भंडारा: भंडारा (Bhandara News) जिल्ह्यात एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये (Bhandara News) घरचे सर्वजण झोपेत असताना भल्या पहाटे पती-पत्नीमध्ये वाद झाला. तो वाद एवढा विकोपाला गेला की रागाच्या भरात पतीने लाकडी पाट पत्नीच्या डोक्यात घातला. हा घाव वर्मी बसल्याने ती रक्तबंबाळ झाली. हे पाहून पतीने घटनास्थवरून पळ काढला. तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारदरम्यान पत्नीचा नागपूर येथे मृत्यू झाला आहे.
काय घडले नेमके?
ही घटना भंडारा जिल्ह्याच्या लाखनी तालुक्यातील सेलोटी गावात घडली आहे. मृतक पत्नीचे नाव भारती भारत चाचेरे (40) असून पतीचे नाव भारत चाचेरे (44) असे आहे. त्यानंतर आरोपी पतीने सुद्धा सेलोटी गावाजवळील नहरात उडी घेऊन आत्महत्या केली. मृत पती – पत्नीमध्ये मागील काही दिवसांपासून क्षुल्लक कारणावरून किरकोळ वाद सुरू होते. मात्र घटनेच्या दिवशी या दोघांमध्ये वाद झाला. या वादात मृतक भारती ही स्वयंपाक घरात गेली. तिच्या पाठोपाठ जात पतीने घरात पडलेला लाकडी पाटाचा जोरदार प्रहार तिच्या डोक्यावर केला. यामुळे ती बेशुद्ध झाली. यानंतर पतीने घटनास्थवरून पळ काढला.
यानंतर मुले झोपेतून उठली तेव्हा त्यांना त्यांची आई रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत स्वयंपाक घरात पडलेली दिसली. मुलांनी आरडाओरड सुरू केला. यानंतर आजूबाजूच्या लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी भारतीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र नागपूर येथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. यानंतर आपल्या आईच्या हत्येची तक्रार 16 वर्षीय मुलगी खुशी हिने लाखनी पोलिसांनी दिली. लाखनी पोलिसांनी आरोपी पतीच्या तपासासाठी पोलिसांची पथके तयार केली आणि शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र भारतने गावाजवळील एका नहारात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे आढळून आले. या घटनेमुळे एका रागापायी एका हसत्या – खेळत्या कुटुंबाचा दुर्दैवी शेवट झाला.