रत्नागिरी : रत्नागिरीमधील (Ratnagiri News) राजापूर तालुक्यात भू गावातील कुंभारवाडी या ठिकाणी एक धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये एका तरुणाने व्यसनावरून झालेल्या भांडणातून आत्महत्या करत आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. ऋषिकेश सुरेश कुंभार असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
काय घडले नेमके?
राजापूर तालुक्यात भू गावातील कुंभारवाडी येथे राहणारा ऋषिकेश सुरेश कुंभार याला दारूचे व्यसन होते. त्या दारूच्या व्यसनावरून त्याचे आपल्या वडीलांसोबत भांडण झाले होते. वडिलांजवळ झालेल्या भांडणाचा डोक्यात राग धरून त्याने हे टोकाचे पाऊल उचलले. रागाच्या भरात त्याने विषारी औषध प्यायले. बागेतील गवत फवारणीचे विषारी औषध प्यायल्याने एकच खळबळ उडाली. अत्यवस्थ झालेल्या ऋषिकेशला घरच्यांनी आणि नातेवाईकांनी मदत करून तात्काळ रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. अखेर उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
ऋषिकेश लाँचवर मासेमारीचे काम करायचा. त्याने रागाच्या भरात आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.