शंकर महादेवन आणि राहुल देशपांडे यांना राम कदम कलागौरव पुरस्कार प्रदान

475 0

पुणे- शास्त्रीय संगीताविषयी नव्या पिढीचे कान तयार करण्याचे काम युवा गायकांनी केले पाहिजेत असे आवाहन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले.
शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानतर्फे 13 वा स्व. राम कदम कलागौरव पुरस्कार गायक व संगीतकार पद्मश्री शंकर महादेवन आणि युवा शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी पवार बोलत होते.

बालगंधर्व मंदिरात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खासदार श्रीनिवास पाटील होते. ज्येष्ठ उद्योगपती विठ्ठलशेठ मणियार, सुहाना-प्रवीण मसाला उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक विशाल चोरडीया, प्रतिष्ठानचे निमंत्रक आणि संस्थापक अध्यक्ष लक्ष्मीकांत खाबिया, उपाध्यक्ष नंदकुमार बंड व्यासपीठावर होते. पवार यांच्या हस्ते प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे उद्घाटन झाले. प्रतिष्ठानच्या वतीने पवार यांचा सन्मान तुळशीमाळ घालून करण्यात आला.

यावेळी शरद पवार यांनी प्रतिष्ठानचे कार्य राज्यातील 18 जिल्ह्यात पोहोचले असून भविष्यात प्रतिष्ठानचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात व्हावा, अशी सदिच्छा पवार यांनी व्यक्त केली. दिल्लीतील निवासस्थानी प्रसिद्ध कलाकारांच्या आयोजित मैफलींच्या तसेच महाविद्यालयीन काळातील संगीत रामायणाच्या आठवणी त्यांनी जागविल्या.

श्रीनिवास पाटील म्हणाले, “रसिकांच्या नगरीत कलाकारांचा सत्कार होत आहे, ही आनंदाची बाब आहे. प्रतिष्ठानविषयी बोलताना ते म्हणाले, अनेक संस्था स्थापन होतात नंतर त्याची संघर्ष समिती बनते अखेरीस त्या मावळतात, परंतु शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठान रौप्य महोत्सवी वर्ष साजरे करीत आहे. रौप्य म्हणजे बंदा रुपया, तो आजही खणखणीत वाजतो आहे”

शंकर महादेवन यांनी उपस्थित पुणेकर रसिकांशी मराठीत संवाद साधला. ते म्हणाले, “राम कदम यांच्या नावे बालगंधर्व रंगमंदिरात माझा मित्र राहुल देशपांडे याच्या बरोबर सन्मान मिळतो आहे, हा माझ्यासाठी आशीर्वादच आहे. पुण्याने माझे प्रत्येकवेळी उत्स्फूर्तपणे स्वागत केले आहे. गायक बोलतो हे कंटाळवाणे आहे म्हणून मी गायनातच रसिकांशी संवाद साधतो” असे सांगून ‘सूर निरागस होवो’ या गीताच्या काही ओळी रसिकांना ऐकविल्या. ‘मोरया मोरया’च्या तालावर रसिकांनीही त्यांना टाळ्यांच्या गजरात साथ केली.

राहुल देशपांडे म्हणाले, “राम कदम हे अतिशय मोठे संगीतकार होते, त्यांनी माझ्या आजोबांसाठी अनेक गाणी केली आहेत. त्यांची प्रत्यक्ष भेट झाली नाही, परंतु ते व्यक्ती आणि संगीतकार म्हणून अतिशय साधे आणि प्रामाणिक होते. सूरांशी प्रामाणिक असणे हे त्यांचे संगीतकार म्हणून वैशिष्ट्य होते” ‘माझे मन राहो तुझे पायी देवा’ या राम कदम यांनी संगीत दिलेल्या गीताच्या काही ओळी देशपांडे यांनी सादर केल्या.

पुरस्कार वितरण सोहळ्यापूर्वी कार्तिकी गायकवाड, सुरंजन खंडाळकर, शुभम खंडाळकर, सावनी सावरकर आणि ऐवंत सुराणा यांनी राम कदम यांच्या सांगितीक वैभावाचे विविध पैलू दाखविणारा मराठी गाण्यांच्या कार्यक्रम सादर केला. सचिन इंगळे, राजू दूरकर, समीर शिवगार, केदार मोरे, अर्शद अहमद, राजा साळुंके, अभय इंगळे, अमृता केदार, निलेश देशपांडे यांनी साथसंगत करणार केली तर निवेदन रवींद्र खरे यांनी केले.

लक्ष्मीकांत खाबिया यांनी प्रतिष्ठानच्या 25 वर्षांतील वाटचालीचा आढावा घेऊन भविष्यातील उपक्रमांविषयी माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र खरे यांनी केले तर आभार नंदकुमार बंड यांनी मानले.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!