नाशिक : नाशिकमध्ये (Nashik Crime News) एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. यामध्ये नाशिकच्या (Nashik Crime News) त्र्यंबक रोडवर दुचाकी आणि बसच्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्र्यंबकरोडवर असलेल्या उज्ज्वल एजन्सीजवळील धोकादायक चौफुलीवर शनिवारी खासगी बस आणि दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात दुचाकीचालक वैभव मच्छिंद्र देशमुख (29 वय, रा. श्रमिकनगर, सातपूर) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय घडले नेमके?
शनिवारी (दि. 12 ऑगस्ट ) दुपारी 3 वाजताच्या सुमारास सातपूर येथील आयटीआय जवळच्या एका कंपनीत नोकरीस असलेला वैभव हा ( एमएच 15 एफपी 5151) या दुचाकीने सातपूरकडे येत असताना त्याच्या बाईकला खासगी बस (एमएच 15 जेसी 0909) ची उज्ज्वल एजन्सी येथील चौफुलीजवळ जोरदार धडक बसली. हि धडक एवढी भीषण होती कि या अपघातात वैभवच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. जर त्याने यावेळी हेल्मेट घातले असते तर कदाचित त्याचा जीव वाचू शकला असता.
इंजिनीअर वैभव हा मच्छिंद्र देशमुख यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या बहिणीचे लग्न झालेले आहे. त्याचे वडील मालवाहतूक करणारी छोटी गाडी चालवतात. त्याच्या अपघाती जाण्याने देशमुख कुटुंबीयांवर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे श्रमिकनगर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.