मुंबई : मुंबईमध्ये काल रात्री एक भीषण अपघात (Mumbai Accident) झाला. यामध्ये भरधाव वेगाने धावणारी अर्टिगा कार वीजेच्या खांबाला धडकून हा भीषण अपघात (Mumbai Accident) झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि, यामध्ये कारचे अक्षरश: दोन तुकडे झाले. हा अपघात झाला तेव्हा कारमधून एकूण 5 जण प्रवास करत होते. या अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी नेहरु नगर पोलिसांच्या मदतीने जखमींना जवळच असणाऱ्या राजावाडी रुग्णालयात दाखल केलं आहे. दरम्यान अपघात नेमका कसा झाला याचा तपास नेहरु नगर पोलिसांकडून करण्यात येत आहे.
कसा झाला अपघात?
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. ही कार चेंबूरच्या दिशेने जात होती. यावेळी ती प्रचंड वेगात होती. कार एससीएलआर ब्रीजवर पोहोचली असता चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि कार वीजेच्या खांबाला जाऊन धडकली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये कारचा अक्षरश: चुराडा झाला.घटनास्थळाचा फोटो पाहिल्यानंतर हा अपघात किती भयंकर होता हे तुम्हाला समजेल.
ही अपघातग्रस्त कार खांबापासून वेगळी करण्यासाठी पोलिसांना तब्बल 1 तास लागला. कार पूर्णपणे खांबात अडकली होती. यानंतर आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. त्यांना तात्काळ जवळच असणाऱ्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. ज्यावेळी अपघात झाला त्यावेळी एकूण 5 लोक प्रवास करत होते. यामध्ये 2 तरुणींचादेखील समावेश होता. नेहरु नगर पोलिस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.