मुंबई : सध्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांना क्लीन चिट मिळाली आहे. पुणे जिल्ह्यात असलेल्या भीमा पाटस सहकारी साखर कारख्यान्यातील भ्रष्टाचाराबाबत राहुल कुल (Rahul Kul) यांना राज्य सरकारकडून क्लीन चिट देण्यात आली आहे. या प्रकरणात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राहुल कुल यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता राहुल कुल यांना क्लीन चिट मिळाल्याने संजय राऊत यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
आमदार राहुल कुल यांनी भीमा पाटस सहकारी साखर कारखान्यामध्ये शेकडो कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप होत होता. या सर्व प्रकरणावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक पत्र देखील लिहीलं होतं. मात्र आता या प्रकरणात राहुल कुल यांना राज्य सरकारकडून क्लीन चिट देण्यात आली आहे.
राज्य सरकारनं नेमकं काय म्हटलं?
साखर कारख्यानात कोणताही घोटाळा झालेला नाही. 2022-23 चा लेखा परीक्षण अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. मात्र 2021-22 च्या लेखा परीक्षण अहवालात कुठलाही गैरव्यवहार झाला नसल्याचे उत्तर राज्य सरकारकडून विधान परिषदेमध्ये देण्यात आले आहे. तर इतर आर्थिक वर्षांच्या अहवालांची चौकशी करण्यासाठी चौकशी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांच्या अहवालातून जे काही समोर येईल त्यानुसार कारवाई केली जाईल असे राज्य सरकारकडून सांगण्यात आले आहे.