सातारा : इर्शाळवाडीमध्ये दरड कोसळल्याची घटना ताजी असताना आता सातारा जिल्ह्यातून (Satara Crime) एक मोठी बातमी समोर आली आहे. यामध्ये एकाच घरामध्ये चौघांचे मृतदेह आढळून आले आहेत. यामुळे हि आत्महत्या आहे कि घातपात? याचा तपास केला जात आहे. या (Satara Crime) घटनेमुळे आजूबाजूच्या परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. एका नातेवाईकांला संशय आल्यामुळे ही संपूर्ण घटना उघडकीस आली.
काय आहे नेमके प्रकरण?
पाटण तालुक्यातील सणबूर या ठिकाणी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळून आले. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. सेवानिवृत्त शिक्षक आनंदा पांडुरंग जाधव, सुनंदा आनंदराव जाधव, संतोष जाधव आणि पुष्पा धस अशी मृत पावलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
अशाप्रकारे झाला खुलासा?
आनंदा पांडुरंग जाधव यांचे एक नातेवाईक त्यांना सकाळी अकरा वाजेपर्यंत कॉल करत होते. मात्र, समोरून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. आनंदा जाधव यांच्या कुटुंबातील कुणीही कॉल उचलत नसल्याने, तसेच कोणताच रिप्लाय येत नसल्याने त्या नातेवाईकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्यानंतर त्याने आनंदा जाधव यांच्या घराकडे तातडीने धाव घेतली. ते जेव्हा घटनास्थळी पोहोचले तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर त्यांनी आजूबाजू्च्या ग्रामस्थांना बोलावलं आणि ग्रामस्थांनी दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. यावेळी (Satara Crime) त्यांना घरात चौघांचे मृतदेह आढळून आले. पोलीस या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चौघांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी कराडला पाठवण्यात आले. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.