कोल्हापूर : मागच्या काही दिवसांपासून राज्यातील काही भागांमध्ये पावसाने मोठ्या प्रमाणात थैमान घातले आहे. या पावसामुळे ओढे आणि नदी नाले ओसंडून वाहत आहेत. या सगळ्या वातावरणाचा आनंद घेण्यासाठी भुदरगड तालुक्यातील रांगणा किल्ल्यावर (Fort Rangana) गेलेले 17 पर्यटक पूल वाहून गेल्याने सहा तास किल्ले रांगणावर (Fort Rangana) अडकून पडले. जास्त पाऊस असल्यामुळे त्यांना कोणतीही मदत मिळू शकली नाही. तब्बल 6 तास हे पर्यटक त्या ठिकाणी अडकून पडले होते. यानंतर या पर्यटकांना स्थानिक ग्रामस्थांनी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी आज पहाटेच्या सुमारास दोरीच्या साह्याने बाहेर काढले.
गेल्या दोन दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असून यामुळे जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील किल्ले रांगणा येथे काल वर्षा पर्यटनासाठी काही पर्यटक गेले होते. ते मज्जा मस्ती करत किल्ल्यावर पोहोचले खरे पण किल्ले रांगणा फिरून येताना परतीच्या मार्गावर असणाऱ्या ताब्यांची वाडी ओढ्याला पूर आल्याने त्यांना माघारी परतायला नाही जमले. वरून मुसळधार पाऊस, ओढ्याला आलेला पूर, आजूबाजूला घनदाट झाडी, त्यातून येणारे प्राण्यांचे आवाज अशा परिस्थितीत हे पर्यटक त्या ठिकाणी अडकले. यानंतर त्यांनी मदतीसाठी आरडाओरड सुरू केली.
Fort Rangana : रांगणा किल्ल्याजवळील पूल वाहून गेल्याने अडकलेल्या 17 पर्यटकांची अखेर सुटका pic.twitter.com/Gtac1Vqmby
— Ajay Rajaram Ubhe (@RajaramUbhe) July 19, 2023
या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांना मिळाली असता त्यांनी तातडीने जिल्हा आपत्ती कक्षाला याची माहिती दिली. यानंतर स्थानिक ग्रामस्थांनी आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या जवानांनी दोरीच्या साह्याने सर्व पर्यटकांना पहाटेच्या पाच वाजताच्या सुमारास सुखरूपपणे बाहेर काढले.