मुंबई : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी काही आमदारांसह बंड करून शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा (Maharashtra Political Crisis) दर्शवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवार (Ajit Pawar) यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेण्याची तयारी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या सगळ्या घडामोडीनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जितेंद्र आव्हाड तर अजित पवार यांच्याकडून मुख्य प्रतोद पदी अनिल पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
अनिल पाटील हे या अगोदरही या पदावर होते. मात्र, अजित पवार यांनी रविवारी त्यांची फेरनियुक्ती केली आहे. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून मुख्य प्रतोदपदी नियुक्त्या केल्यामुळे विधानसभेत मोठा पेच निर्माण होणार आहे. आता विधानसभा अध्यक्ष कोणाला मान्यता देतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. या सगळ्या घडामोडींनंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली.
Ajit Pawar : अजित पवारांसह राष्ट्रवादीचे ‘हे’ नेते होते ईडीच्या रडारवर; मात्र आता सरकारमध्ये सामील
काय म्हणाले जयंत पाटील?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन अजित पवार (Ajit Pawar) यांनी विरोधी पक्षनेतेपदाच्या राजीनाम्याबाबत पक्षाला कळविले नाही. नियमानुसार त्यांनी कळविणे आवश्यक होते, असे सांगितले. त्यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला की नाही, याबाबत अद्याप आपल्याला माहित नाही. पण विधानसभेत राष्ट्रवादीची जास्त संख्या आहे. त्यामुळे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या मान्यतेने मुख्य प्रतोद आणि विरोधी पक्षनेता म्हणून जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती करण्यात आल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले आहे